Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 20:28 IST2020-06-02T20:24:02+5:302020-06-02T20:28:34+5:30
अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका
मुंबई - कोरोनाच्या संकटासंदर्भात आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आज निसर्ग या चक्रीवादळासंदर्भात माहिती देत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. आपण विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षांचा निर्णय घेतला, पण आपली परीक्षा संपत नाहीये. एकामागून एक संकट येत आहे. आता, निसर्ग चक्रीवादळाचा मोठा धोका असून उद्या दुपारपर्यंत अलिबागला हे वादळ येईल. त्यामुळे कुणीही पुढील दोन दिवस घराबाहेर पडायचं नाही, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत
अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळीचा परिस्थितीसंदर्भात माहिती घेतली असून संबंधित यंत्रणांना सूचना केल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितले होते. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.
निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या समुद्रात येत असून ते ताशी १०० ते १२० किमीच्या वेगाने येत आहे. आपण सज्ज असून आर्मी, नेव्ही आणि इतर तुकड्याही तैनात आहेत. गृहमंत्री अमित शहांचा काल फोन झाला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज फोनद्वारे केंद्र सरकारकडून सर्वोतोपरी मदत मिळेल, असे आश्वस्त केले आहे. मात्र, पुढील दोन दिवस आपण सर्वांनी घरांमध्ये राहा, उद्या आणि परवा सर्वच कार्यालय बंद राहतील. घराबाहेर न पडणे हेच सर्वांना माझे आवाहन आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. नुकताच पालघर आणि समुद्रातील मच्छिमारांशी संपर्क झाला असून त्यांनाही लवकरच परत आणलं जाईल. वादळामुळे पाऊसाची दाट शक्यता असून वीजप्रवाह बंद करण्याची गरज भासल्यास तसेही करण्यात येईल, असेही ठाकरेंनी सांगितलं. तसेच, काही महत्वाच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
दूरदर्शन आणि आकाशवाणींच्या सूचनांवर लक्ष देऊन पालन करा
प्रशासन जबाबदारी घेत असून नागरिकांनी प्रशासनाला सहाकार्य करुन सूचनांचं पालन करावं.
सुसाट्याचा वारा आला तरी आपण सुरक्षित राहू शकू, अशा ठिकाणीच थांबण्याचा प्रयत्न करा
पाऊस पडतोय म्हणून शेड किंवा आडोशाला उभा राहून बचावाचा प्रयत्न करू नका
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाच्या वादळाची सद्यस्थिती पाहता आयएमडीने म्हटलं आहे की, पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये तयार झालेला दाबाचा पट्टा मुंबईच्या ५५० किमी, पणजीच्या ३०० किमी, सुरतच्या ७७० किमी दूर आहे. हवामान खात्याने चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेत रात्री अडीच वाजता ही माहिती दिली. मंगळवारी हवेच्या दाबाचा पट्टा आणखी वाढणार असल्याने जवळपास १२ तासाच्या आत समुद्रात तीव्र स्वरुपाचं चक्रीवादळ येणार आहे. चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रातील हरिहरेश्वर, गुजरातमधील दमन यादरम्यान ३ जूनपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली आहे.