मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:24 IST2026-04-05T14:23:38+5:302026-04-05T14:24:17+5:30
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती

मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील मतदारयादी सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (एसआयआर २००२) प्रभावीपणे राबविण्यासाठी पालिका आयुक्तांनी ७ हजार कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश दिले आहे. यामध्ये सर्वाधिक आरोग्य विभागाचे ३,३३०, तर शिक्षण विभागातील २,३३२ शिक्षक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे शिक्षण व आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मतदारयादी परीक्षणासाठी शहर, उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून पालिकेकडे ७ हजार कर्मचारी मागणीच्या प्रस्तावाला पालिका आयुक्तांनी २ एप्रिलला मंजुरी दिली आहे. त्यात सर्वाधिक आरोग्य विभाग आणि नंतर शिक्षण विभागावर या कामाचा भार आहे. तर, उर्वरित ४१ विभागांच्या १० पेक्षा कमी संख्येने कर्मचाऱ्यांना हे नियुक्तीचे आदेश दिले आहेत. यामुळे मुंबईतील २००२ या कालावधीतील मतदारयाद्यांचे सखोल परीक्षण कामाला आता वेग आला आहे.
कर्मचाऱ्यांची नियुक्ती कार्यक्षेत्रात
नियुक्ती आदेश दिलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदारसंघातच करण्यात येणार असून, त्यांनी तत्काळ निवडणूक कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक असेल. मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी सुरू होणाऱ्या या मोहिमेदरम्यान नियुक्त कर्मचारी पूर्णवेळ संबंधित मतदारसंघात काम करणार आहेत. तसेच, सर्व कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.
शिक्षकांनाच दरवेळी या कामाचा भार सोसावा लागतो. परिणामी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची उजळणी करणे, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे, यामुळे शाळेकडे दुर्लक्ष होऊन गुणवत्ता खालावण्याची शक्यता वाढते.
-प्रभाकर दाते, अध्यक्ष, शिक्षण विभाग,राष्ट्रीय कर्मचारी सेना.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम
बीएलओ कामामुळे शिक्षकांचा अध्यापन वेळ कमी होतो, वर्ग नियोजन बिघडते, परीक्षेपूर्व मार्गदर्शन कमी पडते, विद्यार्थ्यांचे शंका निरसन अपूर्ण राहते, अभ्यासक्रम अपुरा राहतो. शिक्षकांच्या मते परीक्षेच्या काळात शिक्षक व्यग्र असल्याने उत्तरपत्रिका तपासणी उशिरा होते, पुनरावृत्ती होत नाही, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होतो, परिणामी गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होतो.