Join us  

Video: देशाचा आक्रोश 56 इंची छातीला जाणवत नाही का? सद्यस्थितीवरून अमोल कोल्हेंचं कवितेतून परखड भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 9:41 AM

कोरोनामुळे देशभरातील परिस्थिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी केला आहे. (NCP MP Amol Kolhe has criticized the central government through poetry)

मुंबई: देशात गुरुवारी कोरोनाचे ३ लाख ६२ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले व ४१२० जणांचा मृत्यू झाला. बुधवारची आकडेवारी लक्षात घेता नव्या रुग्णांच्या संख्येत गुुरुवारी १४ हजारांनी वाढ झाली व मृतांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. गेल्या चोवीस तासात ३ लाख ५२ हजार रुग्ण बरे झाले. कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ३७ लाखांपेक्षा अधिक झाली असून त्यातील १ कोटी ९७ लाख जण आजवर कोरोनामुक्त झाले.

बुधवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ३ लाख ४८ हजार होती व ४२०५ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी ३६२७२७ नवे कोरोना रुग्ण आढळले व ३५,२१८१ जण बरे झाले. कोरोना रुग्णांची एकूण संख्या २,३७,०३,६६५ असून त्यातील १,९७,३४,८२३ जण बरे झाले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ऑक्सिजनपासून व्हेंटिलेटर्स आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होताना दिसत आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये हीच परिस्थिती दिसून येत आहे. अनेकांनी यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवर आफला राग व्यक्त केला आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमधील अनेक दोषांसाठी सरकारची धोरणं जबाबदार असल्याचं सांगत सोशल नेटवर्किंगवरुन सरकावर निशाणा साधला जात आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. 

अमोल कोल्हे यांनी देशातील सद्यस्थितीवर कवितेच्या माध्यमातून परखड भाष्य केलं आहे. कोरोनामुळे देशभरातील परिस्थिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे यांनी केला आहे. या व्हिडिओमध्ये दिल्लीत नवीन संसद भवन आणि पंतप्रधानांचे नवे निवासस्थान असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरुनही टीकास्त्र सोडलं आहे. तसेच देशाचा आक्रोश 56 इंची छातीला  जाणवत नाही का?, असा टोला देखील अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. ( (NCP MP Amol Kolhe has criticized the central government through poetry))

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन अशा देशातल्या एकूण १२ पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्तपणे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये राजधानी दिल्लीमधील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, नागरिकांसाठी मोफत लसीकरण, केंद्र सरकारने पारित केलेले ३ कृषी कायदे अशा एकूण ९ मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प तातडीने थांबवण्यात यावा आणि त्यासाठी देण्यात आलेला निधी ऑक्सिजन आणि लसींचा साठा मिळवण्यासाठी वापरावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

कोरोना नियमांचे पालन

सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या कामाचे केंद्र सरकारकडून समर्थन करण्यात आले आहे. हे काम कोरोना कर्फ्यू लागण्यापूर्वीच सुरू झाले आहे. तसेच या कामासाठी काम असलेले मजूर यांची योग्य काळजी घेतली जात आहे. कामाच्या ठिकाणी आणि मजुरांच्या राहण्याच्या ठिकाणी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जात आहे. याशिवाय, मजुरांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. काम थांबवण्यासंदर्भात दाखल केलेली याचिका खोट्या दाव्यांवर करण्यात आली आहे, असे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सुनावणीवेळी सांगितले. 

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेनरेंद्र मोदीकोरोना वायरस बातम्याकेंद्र सरकारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा