शिवसेनाच संपत नाही म्हणून चोरायला निघाले, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 08:07 IST2023-10-29T08:07:18+5:302023-10-29T08:07:32+5:30
दादरमधील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात केली सडकून टीका

शिवसेनाच संपत नाही म्हणून चोरायला निघाले, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर यांनी शिवसेना संपवायचा घाट घातला, कारण महाराष्ट्रात यांना कुणी जर रोखणारे असेल ती शिवसेना आहे. दुसऱ्या कुणाच्यात हिंमत नाही. शिवसेना संपत नाही म्हटल्यावर ती चोरायला निघालेत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली.
ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा दादर येथे पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले, सगळे उद्योग तिकडे नेतायत आणि कोकणला बरबाद करणारी रिफायनरी इकडे आणतायत. शिवसेनेच्या जीवावर जे मोठे झाले त्यांनी शिवसेनेला आलेली फुलं तोडून नेली पण माझी मूळं घट्ट आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठीच शिवसेना फोडली.
२०१४ पासून भाजपचे लोक शिवसेना संपवायला निघाले आहेत. परंतु भाजपला खऱ्या अर्थाने हिंदुत्व शिकवलं ते शिवसेनेने. शिवसेनाप्रमुखांनी जेव्हा हिंदुत्वाचा नारा दिला तेव्हा भाजपलाही सोबत घेतलं. त्यापूर्वी भाजपचे केवळ २ खासदार निवडून आले होते. हिंदुत्वाचा मक्ता काही एकट्या भाजपनं घेतलेला नाही, असेही ठाकरे म्हणाले.