Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:33 IST2025-06-06T14:26:23+5:302025-06-06T14:33:02+5:30

Uddhav And Raj Thackeray Alliance News : कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू झाले असून नेत्यांचे मनोमिलन कधी होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

Uddhav Thackeray reaction over over mns raj thackeray and thackeray shivsena alliance | Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. राज्यातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते एकमेकांना भेटत आहेत. कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू झाले असून नेत्यांचे मनोमिलन कधी होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. "जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, लवकरच बातमी देईन" असं म्हटलं आहे. 

शिंदे गटाच्या सुजाता शिंगाडे यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत 'मनसे'सोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे. "जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. त्याबद्दलचे बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आमचे आम्ही बघत आहोत. शिवसैनिकांच्या मनात कुठेच संभ्रम नाही. त्यांचे जे सैनिक संपर्कात आहेत, त्यांच्याही मनात संभ्रम नाही. संदेश देण्यापेक्षा लवकरच जी काही बातमी द्यायची आहे ती देऊ" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. "नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. राज ठाकरे यांचे सहकारी आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक आहेत. त्याचाच परिणाम जमिनीवर कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालं असेल. त्यात चिंता करण्यासारखं काय आहे, उलट या गोष्टीचं स्वागत करायला हवं" असं राऊत यांनी म्हटलं आहे. 

ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "दोघं भाऊ, फक्त एक फोन अन्..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना युतीवरही भाष्य केलं आहे. "दोन भावांनी बोललं पाहिजे. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात" अशी प्रतिक्रिया दिली. "माझी भूमिका एवढीच आहे की, दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन भाऊ एकत्र येण्यात मला काही इश्यू नाही. मी २०१४, २०१७ ला बघितलंय, कोरोना काळातही पाहिलंय, कोरोनात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा राज साहेबांनी उद्धवजींना पहिला फोन केला होता. हा भीषण आजार आहे. त्यामुळे कोणतंही सरकार असो, आपण साथ दिली पाहिजे असं म्हटलं होतं. त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून युती होत नाही. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात" असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

Web Title: Uddhav Thackeray reaction over over mns raj thackeray and thackeray shivsena alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.