जनतेच्या मनात आहे ते होईल, थेट बातमी देऊ! राज सोबत येण्याबाबत उद्धव यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:19 IST2025-06-07T12:18:38+5:302025-06-07T12:19:11+5:30
मनसेने साद दिली आहे, त्याला प्रतिसाद कधी देणार? असा विचारला होता प्रश्न

जनतेच्या मनात आहे ते होईल, थेट बातमी देऊ! राज सोबत येण्याबाबत उद्धव यांचे विधान
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जनतेच्या मनात आहे ते होईल, आता संदेश नाही तर थेट बातमी येईल, असे विधान उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि ते एकत्र येण्याबाबत शुक्रवारी केल्याने ठाकरे एकीकरणाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.
मनसेने साद दिली आहे, त्याला प्रतिसाद कधी देणार? असा प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारला असता ते म्हणाले की, ‘जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहात आहोत. मी तुम्हाला फक्त संदेश नाही तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काहीही संभ्रम नाही. त्यांच्याही सैनिकांच्या मनात संभ्रम नाही. आमचे कार्यकर्ते संपर्कात आहेत. उद्धव यांच्या या विधानामुळे आता काय होते, याची उत्सुकता आहे.
मनात काय? : मनसे
मुंबई मनसेचे अध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले की, जनतेच्या मनात काय त्यापेक्षा तुमच्या मनात काय ते महत्त्वाचे आहे. २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेला कौल देण्याचे जनतेच्या मनात होते आणि जनतेने तो दिलाही होता. तरीही उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत गेले आणि जनभावनेचा अव्हेर त्यांनी केला. त्यामुळेच त्यांच्या मनात काय ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे एकत्र येण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव पाठवावा. राज-उद्धव ठाकरे एकत्र येणे हे २०१४ आणि २०१७ मध्येही जनतेच्या मनात होते.
‘लवकरच फळे दिसतील’
उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याबाबत लवकरच भरभरून फळे आलेली तुम्हाला दिसतील. होऊ शकते की ते दोघे एकत्र येण्याबाबत एकमेकांशी बोलतही असतील, असे उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत म्हणाले.
योग्यवेळी बोलू : देवेंद्र फडणवीस
त्यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे प्रतिक्रिया देतील, माझा काय संबंध येतो. ते आपसात ठरवतील, साद-प्रतिसाद द्यायचा का, आतातरी त्यावर प्रतिक्रिया देण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही. त्यांचे ते ठरवतील. मी योग्यवेळी प्रतिक्रिया देत असतो, तशी मी योग्यवेळी प्रतिक्रिया मी देईन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव-राज एकत्र येण्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी हात जोडले. ‘महायुतीचाच विजय होईल’ एवढेच ते म्हणाले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हटले, की राज व उद्धव आपापल्या पक्षांचे प्रमुख आहेत. त्यांच्याबाबत आम्हाला का विचारता?.