Join us

आपल्याकडे निष्टावंतांची गर्दी तर त्यांच्याकडे गार्दी लोकांची टोळी; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 20:47 IST

आज शिवसेनेचा 57वा वर्धापण दिन आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.

मुंबई: आज शिवसेनेचा 57वा वर्धापण दिन आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुखउद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. '57 वर्षांपूर्वी जशी गर्दी असायची, तशीच आजही आहे. इथे निष्ठावंत शिवसैनिकांची गर्दी आहे. आपल्याकडे गर्दी आहे, त्यांच्याकडे गार्दी आहेत. पुर्वीच्या काळात लढायांमध्ये गोंधळ घालायला, गार्दींच्या टोळ्या असायच्या, अशा त्या टोळ्या आहेत,' अशी टीका ठाकरेंनी केली.

ते पुढे म्हणाले, 'ते लाचार मिंध्ये म्हणणतात सुर्यावर्ती थंकू नका. कोण सुर्य, कुठला सुर्य? तो सुर्य तिकडे मणिपूरमध्ये का उगवत नाही? तिकडे मणिपूरमध्ये लिबियासारखी परिस्थिती झाली आहे. डबल इंजिन सरकार फक्त वाफा सोडतंय. तिकडे भाजप नेत्यांची घरे जाळली जात आहेत, मंत्र्यांचे घर जाळले. आम्हालाही वाईट वाटतंय. माझ्या देशातला एक भाग जळतोय, त्याचं वाईट वाटतंय, हे आमचं हिंदूत्व आहे.'

'देवेंद्र फडणवीसांनी हास्यजत्रेचा प्रयोग केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोनाची व्हॅक्सीन मोदींनी तयार केली. यांच्या डोक्यात कोणता व्हायरस घुसलाय, काय माहीत. कोरोनाची व्हॅक्सीन यांनी तयार केली तर संशोदक काय गवत उपटत बसले होते का? यांना कोणतं व्हॅक्सीन द्यावं, हेच कळत नाही. यांना मानसिक रुग्णालयात पाठवावं लागेल. हे सगळे अवली आहेत, लव्हली कोणीच नाही. तुम्ही अवली असला तरीही जनता कावली आहे.' 

ठाकरे पुढे म्हणाले, 'ते नेहमी म्हणतात की आम्ही हिंदूत्व सोडलं. का, तर काँग्रेससोबत गेलो म्हणून. नरसिंहरावांच्या काळात आमची युती होती, तेव्हा घोषणा व्हायच्या, इस्लाम खतरे मे है. आता घोषणा होते, हिंदू खतरे मे है. तेव्हा इस्लाम खतरे मे होता, आता तुम्ही ताकतवर नेते आहात, आता हिंदू खरते मे असेल, तर तुम्ही त्या गादीवर बसण्यास लायक नाहीत. तुम्ही सत्ता चालवायला नालायक नाहीत. काश्मीरमध्ये, मणिपूरमध्ये हिंदू मारले जात आहेत. हिंमत असेल तर देशाचे शत्रू संपवा, विरोधक कसले संपवता,' अशी टीकाही त्यांनी यावेली केली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीस