मुंबई काँग्रेसच्या दोन आमदारांचा स्वबळाचा नारा; भावना पक्षश्रेष्ठींना कळवू : खासदार वर्षा गायकवाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 06:49 IST2025-07-14T06:49:00+5:302025-07-14T06:49:14+5:30
आम्ही या महाराष्ट्रात, मुंबईत जन्माला आलो याचा आम्हाला गर्व आहे, मराठी आमची भाषा मानतो. पण मराठी बोलायला येत नाही म्हणून कोणाला मारझोड कराल, तर काँग्रेस अशा लोकांसोबत उभी राहू शकत नाही. - काँग्रेस.

मुंबई काँग्रेसच्या दोन आमदारांचा स्वबळाचा नारा; भावना पक्षश्रेष्ठींना कळवू : खासदार वर्षा गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक मुंबई काँग्रेसने स्वबळावर लढवावी अशी मागणी मुंबईचे आमदार अस्लम शेख आणि आमदार अमीन पटेल यांनी केली असली तरी पक्षाचे नेते, पदाधिकारी स्वबळाची मागणी करत असतात. सगळ्यांची भूमिका समजून घेऊन ती दिल्लीला कळवली जाईल. पक्षश्रेष्ठी सांगतील त्या पद्धतीने मुंबई महापालिकेत काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरेल असे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आम्ही या महाराष्ट्रात, मुंबईत जन्माला आलो याचा आम्हाला गर्व आहे, मराठी आमची भाषा मानतो. पण मराठी बोलायला येत नाही म्हणून कोणाला मारझोड कराल, तर काँग्रेस अशा लोकांसोबत उभी राहू शकत नाही. आम्ही संविधान मानणारे लोक आहोत, असे यावेळी माजी मंत्री अस्लम शेख यांनी जाहीर भाषणात व्यक्त केले. मुंबई काँग्रेसने भायखळा येथे आयोजित ‘संविधान जिंदाबाद जनसभा’ कार्य्रक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.
...तर मुंबईचा महापौर काँग्रेसचा असेल
आमदार अमिन पटेल यांनी प्रतापगढी यांना मुंबई महापालिका निवडणुकीत प्रचारासाठी आठ दिवस मुंबई मुक्काम करण्याचे आवाहन भाषणातून केले आणि प्रतापगढी यांनी ते मान्यही केले. ‘विधानसभा निवडणुकीत अमिन पटेलसह राज्यात सोळा मतदार संघात तुम्ही फिरलात आणि ते सगळे जिंकून आले. आता मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत आहे.
मुंबई महापालिकेवर तिरंगा फडकवायचा असेल तर प्रत्येक गल्लोगल्ली इम्रान प्रतापगढी दिसल्यास महापालिकेवर तिरंगा फडकेल आणि मुंबईचा महापौर काँग्रेसचा असेल,’ असे पटेल यांनी सांगितले. तसेच ‘आम्ही मराठी आहोत. मराठी आणि हिंदीत, आई आणि मावशीचे नाते आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. तर ‘दक्षिण मुंबईपासून उत्तर मुंबईपर्यंत स्वबळावर काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणा, असेही आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.