"हा अपघात नाही घातपातच, मुंबईत सकाळी ६ वाजता कुठे ट्राफिक असतं?", अजित पवारांसोबत मृत्यू झालेल्या पिंकी माळीच्या वडिलांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:56 IST2026-02-11T15:54:50+5:302026-02-11T15:56:16+5:30
Ajit Plane Crash Serious Allegations: अजित पवार यांच्यासोबत पिंकी माळी फ्लाईट अटेंडन्ट म्हणून विमानातून प्रवास करत होती. बारामती विमानतळावर हे विमान कोसळले आणि त्यात अजित पवार, पिंकी माळी यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.

"हा अपघात नाही घातपातच, मुंबईत सकाळी ६ वाजता कुठे ट्राफिक असतं?", अजित पवारांसोबत मृत्यू झालेल्या पिंकी माळीच्या वडिलांचा गंभीर आरोप
अजित पवार यांचा विमान कोसळून मृत्यू झाला. या विमान अपघाताबद्दल आता घातपाताचे आरोप केले जात आहे. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल अपघाताविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. रोहित पवार यांच्या आरोपानंतर विमान अपघातात मृत्यू झालेल्या पिंकी माळी हिच्या वडिलांनीही हा घातपात असल्याचा गंभीर आरोप करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
बारामती येथे विमान अपघाताची घटना आमदार रोहित पवार यांच्या आरोपांनंतर चर्चेत आली आहे. आमदार रोहित पवारांच्या यांच्या पत्रकार परिषदेनंतर बोलताना मयत पिंकी माळी हिचे वडील शिवकुमार माळी यांनी केला आहे.
पिंकी माळीचे वडील अपघाताबद्दल काय बोलले?
"पिंकीने चार वेळा अजित पवारांसोबत काळ्या आणि करड्या रंगाच्या विमानातून प्रवास केला होता. अपघाताच्या दिवशी मात्र पांढऱ्या रंगाचे विमान का दिले गेले?", असा सवाल शिवकुमार माळी यांनी केला आहे.
अजित पवार ज्या विमानातून बारामतीला निघाले होते आणि ते अपघातग्रस्त झाले. त्या विमानाचा पायलट ऐनवेळी बदलण्यात आला, असेही समोर आले आहे. त्यावर पिंकी माळी हिचे वडील म्हणाले की, "सकाळी ६ वाजता मुंबईतील कोणत्या भागामध्ये ट्राफिक असते. विमान अपघाताच्या दिवशी फक्त पायलट नाही, तर विमानही बदलले गेले होते होते", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
"रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याजवळ असलेले पुरावे सगळ्यांसमोर मांडण्याचे काम केले. त्यांच्याप्रमाणे आम्हालाही हा घातपात असल्याचा संशय आहे", असेही शिवकुमार माळी यांनी म्हटले आहे.
रोहित पवारांनी विमान अपघाताबद्दल कोणते प्रश्न उपस्थित केले आहेत?
१) दादांचा दौरा बदलणे, विमानाची वेळ बदलणे, पायलट बदलणे यामागचे कारण काय?
२) केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल आणि एटीसी ट्रान्सस्क्रिप्टमधील वेळांमध्ये विसंगती का?
३) दृश्यमानता कमी होती तर लँड का केले?
४) विमानाचा आवाज वेगळा का येत होता? ट्रान्सपॉन्डर बंद होता की बंद केला होता?
५) पायलट सुमित कपूरचा ट्रॅक रेकॉर्ड वाईट होता. दारू प्यायल्याबद्दल त्याला तीन वर्षे निलंबित केलं होतं.
६) पायलटवर कुाचा दबाव होता का?
७) मृत्यू समोर असतानाही मुख्य पायलट गप्प होता याचा अर्थ काय घ्यायचा?
८) विमान क्रॅश करायचीच मानसिकता होती का?
९) पायलटवर कुणाचा दबाव होता का?
१०) फॉरेन्सिकची टीम उशिरा का आली?