Crime: लोकलमधील गर्दीआडून चोरट्यांची रोज हातसफाई; देशातील २०% गुन्हे महाराष्ट्रात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 10:39 IST2025-10-11T10:38:53+5:302025-10-11T10:39:02+5:30
Crime Rate in Maharashtra: गुजरात, झारखंड, बिहारही आघाडीवर, अहवालानुसार, २०२३ मध्ये रेल्वे पोलिस दल (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांनी देशभरात एकूण ९.५५ लाख गुन्हे नोंदवले.

Crime: लोकलमधील गर्दीआडून चोरट्यांची रोज हातसफाई; देशातील २०% गुन्हे महाराष्ट्रात!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील एकूण रेल्वे गुन्ह्यांपैकी तब्बल २० टक्के गुन्हे एकट्या महाराष्ट्रात घडल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी) च्या ताज्या अहवालातून समोर आली आहे. महाराष्ट्राखालोखाल गुजरात, झारखंड, बिहार आणि दिल्लीचा नंबर लागतो. यामध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्याची लगबग वाढताना दिसत आहे.
अहवालानुसार, २०२३ मध्ये रेल्वे पोलिस दल (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांनी देशभरात एकूण ९.५५ लाख गुन्हे नोंदवले. त्यापैकी महाराष्ट्रातील गुन्ह्यांचा आकडा १.८२ लाख होता. ही संख्या २०२१ मध्ये १.०७ लाख होती. म्हणजेच २ वर्षांत ७५,००० गुन्ह्यांची वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात रेल्वेत सर्वाधिक मालमत्ता चोरी, जबरी चोरी आणि दरोड्याचे गुन्हे नोंद झाले आहेत. देशात नोंदवण्यात आलेल्या एकूण मालमत्ता चोरीच्या ६२,१७३ गुन्ह्यांपैकी २२,६०१ गुन्हे फक्त महाराष्ट्रात घडले आहेत. म्हणजेच एकट्या महाराष्ट्रात ३६% चोरीचे गुन्ह्यांसह हाणामारी, विनयभंग, अपहरण यांसारख्या गुन्ह्यांचेही प्रमाण राज्यात सर्वाधिक म्हणजेच सुमारे १८% टक्के आहे.
लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्येही धुमाकूळ
मुंबई उपनगरीय लोकलसेवेचा प्रचंड वापर आणि ४०० हून अधिक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधील दैनंदिन ८० लाख प्रवाशांची वर्दळ ही गुन्हेगारांसाठी सोपी संधी ठरते, असे पोलिसांचे निरीक्षण आहे.
यासोबतच, झोपी गेलेल्या प्रवाशांचे मोबाइल- पाकिट चोरी, महिलांवरील विनयभंगाच्या घटना, स्टेशन परिसरातील जबरी चोरी आणि गोंधळाचा फायदा घेत अपहरणासारख्या घटना घडत असल्याचे सातत्याने समोर येत आहेत.
प्रवाशांनी कशी घ्यावी सामानाची काळजी?
प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. अनोळखी व्यक्तींशी संवाद करताना सतर्क राहा. संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित जीआरपी आरपीएफला माहिती द्या.