...तेव्हा संजय राऊतांवर टीका का झाली नाही, सिल्वर ओकची सहमती होती का? नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 15:40 IST2023-09-20T15:39:21+5:302023-09-20T15:40:26+5:30
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

...तेव्हा संजय राऊतांवर टीका का झाली नाही, सिल्वर ओकची सहमती होती का? नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल
मुंबई- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. या टीकेवरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता टीकेला बाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच राणे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना सवालही केले आहेत.
"अपमान करण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं का?"; सुप्रिया सुळेंचा कडक सवाल
आमदार नितेश राणे म्हणाले, अजित पवार हे राज्याचे नेते आहेत. राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपची युती आहे. राज्यात मविआ सरकार असताना आणि अजित पवार महायुतीत नव्हते तेव्हा संजय राऊत हे सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करत होते. सुप्रिया ताई ७० हजार कोटींच्या कारवाईची संसदेत मागणी करतात आणि दुसरीकडे गोपीचंद यांनी टीका केल्यावर बोलतात. गोपीचंद पडळकर यांच्यावर जी टीका आज होते तशी टीका संजय राऊत यांच्यावर का झाली नाही? सिल्व्हर ओकची संजय राउत यांना मुक्त सहमती होती का? संजय राऊत यांना टीका करायला कुणी लावत होते, असा सवालही आमदार नितेश राणे यांनी यावेळी केला.
आमदार राणे म्हणाले,आमदार रोहित पवार आणि सुप्रिया ताई अजित पवार यांच्याबद्दल द्वेष करतात. संजय राऊत यांना त्यावेळी सुपारी दिली होती, असा टोलाही राणे यांनी लगावला.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. याबाबत पत्रकारांनी पडळकरांना प्रश्न विचारला की, तुम्ही अजित पवारांना पत्र का पाठवलं नाही? त्यावर ते म्हणाले की, 'अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे', अशी टीका त्यांनी यावेळी केली होती. त्याचसोबत सुप्रिया सुळे यांनाही लबाड लांडग्याची लेक, म्हटलं होतं. पडळकरांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही पडळकरांवर त्याच भाषेत टीका केली. गोप्या म्हणत पडळकरांना डुकराची उपमा मिटकरी यांनी दिली होती.
देवेंद्र फडणवीसांनी कान टोचले
गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे, तिन्ही पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. अशाप्रकारच्या भाषेचा बिलकुल उपयोग करू नये, असे माझं स्पष्ट मत आहे अशी भूमिका मांडत देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांचे कान टोचले.