Sanjay Raut:मनसेने साद दिली आहे, त्याला प्रतिसाद कधी देणार? असा प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारला असता ते म्हणाले की, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहात आहोत. तुम्हाला फक्त संदेश नाही तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काहीही संभ्रम नाही. त्यांच्याही सैनिकांच्या मनात संभ्रम नाही. आमचे कार्यकर्ते संपर्कात आहेत. उद्धव यांच्या या विधानामुळे आता काय होते, याची उत्सुकता आहे. उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारचे विधान केले असले तरी मनसे नेते प्रस्ताव देण्याबाबत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. तसे मनसे नेत्यांनी स्पष्टही केले आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मागच्या गोष्टी कोण काढते आहे? त्यात मला रस नाही. ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचे आहे तो मागे वळून पाहात नाही. आम्हीही मागे वळून पाहात नाही. २०१७ मध्ये काय झाले? २०१४ मध्ये काय झाले? १८५७ ला तुमचा विचार असा होता, १६२२ मध्ये काय घडलं? या गोष्टी आम्ही बघत नाही. किती मागे जाणार? भविष्याकडे पाहा ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्र संपवण्याचे हे काम एकनाथ शिंदे गट, देवेंद्र फडणवीस, अमित शाह हे सगळे करत आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मेहराबानीने आम्ही मुख्यमंत्री झालो नाही
श्रीकृष्णाने भगवद्गीता लिहिली त्यानंतर देवेंद्र फडणवीस आता नवी गीता लिहीत आहेत. आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मेहराबानीने आम्ही मुख्यमंत्री झालेलो नाही. हाताशी यंत्रणा असणे, पोलीस, ईडी, सीबीआय म्हणजे मी सर्वेसर्वा असा त्याचा अर्थ होत नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला. मराठी माणूस म्हणून कुणाच्या मनात नाही की, ठाकरे बंधूनी एकत्र यावे? जे महाराष्ट्र द्रोही आहेत, ज्यांचे केंद्र दिल्ली आणि अहमदाबाद आहे अशांचा पाडाव करावा असे कुणाला वाटणार नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस, भाजपा नाही. भाजपा उपऱ्यांचा पक्ष आहे. तो शेठजींचा पक्ष आहे त्यांना मराठी माणूस, महाराष्ट्र अस्मिता यांच्याशी काही घेणे-देणे नाही. आम्ही उरलेले लोक आहोत ते १०६ हुतात्म्यांशी बांधिलकी ठेवून काम करणारे आहोत. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आम्ही सगळे त्यांचेच शिष्य आहोत. महाराष्ट्राच्या हितासाठी संयुक्त राष्ट्राच्या लढ्यात अनेक पक्ष एकत्र आले. त्यावेळी मराठी माणसाचा विजय झाला. आता त्याच प्रकारचे वातावरण भाजपाने निर्माण केले आहे. त्यामुळे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज हे सांगणाऱ्या पक्षांना एकत्र यावे लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.