मोदी सरकारची दहा वर्षे जनतेसाठी विषकाळ; काँग्रेस नेते सचिन पायलट यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 11:50 AM2024-02-21T11:50:08+5:302024-02-21T11:50:39+5:30

पायलट यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कामकाजाचा पाढा वाचला.

Ten years of Modi government is a toxic time for the people; Criticism of Congress leader Sachin Pilot | मोदी सरकारची दहा वर्षे जनतेसाठी विषकाळ; काँग्रेस नेते सचिन पायलट यांची टीका

मोदी सरकारची दहा वर्षे जनतेसाठी विषकाळ; काँग्रेस नेते सचिन पायलट यांची टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रात आलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार दहा वर्षांत सर्व आघाड्यांवर नापास झालेले आहे. केवळ मूठभर लोक श्रीमंत झाले असून, सर्वसामान्य जनता, मध्यमवर्ग, शेतकरी, कामगार यांचे प्रचंड हाल झाले आहेत. मोदी सरकारने जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, केवळ मोठमोठ्या थापा मारल्या असून, मोदींचा दहा वर्षांचा काळ हा अमृतकाळ नाही तर जनतेसाठी विषकाळ ठरला आहे, असा घणाघाती हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी केला आहे.

पायलट यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कामकाजाचा पाढा वाचला. ते पुढे म्हणाले की,  सत्तेत येताना नरेंद्र मोदी यांनी भरमसाठ आश्वासने दिली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करतो, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देतो, अशी आश्वासने दिले पण ही सर्व आश्वासने हवेतच विरली. यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही.

शेतकऱ्यांना दिलेला शब्द मोदी सरकारने आजही पाळलेला नाही. उलट त्यांना चिरडून टाकत आहे. पीकविमा कंपन्यांनी ४० हजार कोटी रुपये कमावले; परंतु शेतकऱ्यांना कोणतीच मदत मिळत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर मोदी सरकारने १०० रुपये लिटरपर्यंत वाढविले, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किमती कमी झाल्या आहेत तरीही पेट्रोल, डिझेलचे दर मात्र कमी केले नाहीत, अशी घणाघाती टीका पायलट यांनी केली.

विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी ईडीचा गैरवापर केला गेला. ईडीने ९५ टक्के छापे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टाकले आहेत, यातील केवळ १ टक्के प्रकरणात शिक्षा झाली आहे. भाजपला निवडणुकीत यश मिळेल याचा आत्मविश्वास नाही. म्हणूनच विरोधी पक्षांची फोडाफोडी ते करत आहेत.

- सचिन पायलट

Web Title: Ten years of Modi government is a toxic time for the people; Criticism of Congress leader Sachin Pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.