पीएनजी कनेक्शन घ्या, अन्यथा सिलिंडर बंद होणार; ३० जूनपर्यंतची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 06:42 IST2026-03-31T06:42:41+5:302026-03-31T06:42:41+5:30
युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी सिलिंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

पीएनजी कनेक्शन घ्या, अन्यथा सिलिंडर बंद होणार; ३० जूनपर्यंतची मुदत
मुंबई: पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धामुळे स्वयंपाकाच्या गॅसच्या तुटवड्यावर पर्याय म्हणून राज्यातील जनतेने ज्या ठिकाणी शक्य असेल, त्या ठिकाणी गॅस पाइप जोडणी (पीएनजी) घ्यावी, अन्यथा त्यांचा एलपीजी सिलिंडर पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला. जिथे पीएनजी सेवा उपलब्ध आहे तिथे ग्राहकांनी तीन महिन्यांत पीएनजीसाठी अर्ज करावेत. त्यासाठी येत्या ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी सिलिंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. घरगुती व व्यावसायिक ग्राहकांनी तीन महिन्यांत पीएनजी कनेक्शनसाठी अर्ज करावेत. तसेच गॅस कंपन्यांशी समन्वय वाढवून अर्ज निकाली काढण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत, असे भुजबळ यांनी सोमवारी सांगितले.
पाइप गॅस सुविधा उपलब्ध नसेल तर?
ही अट फक्त ज्या भागात पाइप गॅस सुविधा उपलब्ध आहे त्या ठिकाणच्या नागरिकांनाच लागू असणार आहे. ज्या ठिकाणी पाइप गॅस सुविधा उपलब्ध नाही त्या ठिकाणच्या नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. त्यांचे एलपीजी सिलिंडर रद्द करण्यात येणार नाही. मात्र, सुविधा असूनही ज्यांनी पीएनजी कनेक्शन घेतले नाही, त्यांनी तत्काळ अर्ज करावेत.
...तरच ताबा प्रमाणपत्र
मुंबई, पुणे यांसारख्या शहरातील सर्व नव्या बांधकामांमध्ये पाइप गॅस सुविधा अनिवार्य करण्याची अट घालण्याची मागणी केंद्र सरकारला केली असून ती मान्य झाली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे नवीन इमारतींना महापालिकांकडून ताबा प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी पाइप गॅसची जोडणी रहिवाशांना देणे आवश्यक असणार आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी होईल, असे भुजबळ यांनी सांगितले.