हिवाळी अधिवेशनापर्यंत राजीनामे स्वीकारणं अशक्य, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 17:53 IST2018-07-26T17:52:52+5:302018-07-26T17:53:50+5:30
महाराष्ट्रातील मराठा आमदारांनी राजीनामा देण्याचं सत्र सुरू केलं आहेत.

हिवाळी अधिवेशनापर्यंत राजीनामे स्वीकारणं अशक्य, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचं वक्तव्य
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन केली जातायत. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी विरोधकांनीही आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. पण मराठ्यांचं आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत अडकलं आहे. त्यामुळे सरकार त्यातून कसा मार्ग काढणार हा एक प्रश्नच आहे. त्यात आता महाराष्ट्रातील मराठा आमदारांनी राजीनामा देण्याचं सत्र सुरू केलं आहेत.
आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चार ते पाच आमदारांनी राजीनामे दिले आहे. शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम, काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सोपवले आहेत. तर भाजपा आमदार सीमा हिरे, आमदार राहुल अहेर यांनी मराठा मोर्चाच्या समन्वयकांकडे राजीनामे दिले आहेत. परंतु हे राजीनामे हिवाळी अधिवेशनापर्यंत स्वीकारणं शक्य नसल्याचं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केलं आहे.