शिवस्मारक बोट दुर्घटना अपघात नसून 'घातपात', अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 21:09 IST2018-10-24T21:08:10+5:302018-10-24T21:09:08+5:30
शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जात असताना बुधवारी एका स्पीड बोटीला अपघात झाला. स्पीड बोट खडकावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवस्मारक बोट दुर्घटना अपघात नसून 'घातपात', अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
मुंबई - शिवस्मारक पायाभरणी कार्यक्रमातील दुर्घटनेबाबत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हा घातपात असल्याचे म्हटले आहे. तसेच शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटेंनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा आजच्या घटनेशी संबंध असल्याचाही गंभीर आरोपही अशोक चव्हाणा यांनी केला आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली आहे.
शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जात असताना बुधवारी एका स्पीड बोटीला अपघात झाला. स्पीड बोट खडकावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन ही बोट जात होती. या दुर्घटनेत बोटीतील सिद्धेश पवार नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मात्र, अशोक चव्हाण यांनी या दुर्घटनेला घातपात असण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच विनायकम मेटेंनी या शिवस्मारकाच्या कंत्राटमधील भ्रष्टाचाराबाबत मुख्यंत्र्यांना पत्र लिहिले होते. जे पत्र आज माध्यमांसमोर आले असून ते सोशल मीडियातही व्हायरल झाले आहे. त्यामुळे मेटेंच्या आरोपाचा या अपघाताशी संबंध असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी या स्पीड बोट अपघाताची सखोल चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 'सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. या स्पीड बोट अपघाताची चौकशी होणार आहे,' असे फडणवीस यांनी म्हटले.