Join us  

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी केलेलं 'ते' विधान ऑन रेकॉर्ड आहे; संजय राऊतांचं प्रत्युत्तर

By मुकेश चव्हाण | Published: November 28, 2020 2:41 PM

देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेनंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. 

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाकडून सरकारच्या कामाची पोलखोल करण्यात आली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. हात धुवून मागे लागू म्हणणारे उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजवरच्या इतिहासात पाहिले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीला शोभणारं नाही'', अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेनंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. 

एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद पाहिली. विरोधी पक्षांनी त्यांच्या पद्धतीने आजचा दिवस सादर केला. त्यांच्या भावनांचा आदर करतो, असं संजय राऊतांनी सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांचं एक विधान ऑन रेकॉर्ड आहे. देवेंद्र फडणवीसांनी सर्वांच्या कुंडल्या माझ्या हातात असल्याचं विधान केलं होतं. विरोध करणाऱ्यांच्या तुम्ही कुंडल्या जवळ ठेवल्या, मग ती कोणती भाषा, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

तत्पूर्वी, ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीवर भाजपने आज 'ठाकरे सरकारची काळी पत्रिका' नावाच्या पुस्तिकेचं प्रकाशन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि इतर भाजपा नेते उपस्थित होते. फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकार सर्वच बाबतीत सपशेल अपयशी ठरल्याचं सांगत सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं सांगितलं. सरकारने पहिल्या वर्षात फक्त निर्णयांना स्थगिती देण्याचं काम केल्याची टीका देवेंद्र फडणवीसांना केली.

अर्णब, कंगना प्रकरणात सरकार तोंडावर आपटलं-

सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी प्रकरणात आणि मुंबई हायकोर्टाने कंगना प्रकरणात दिलेल्या निकालांवरुन फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. ''सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने दिलेल्या निर्णयातूनच सरकारच्या कामगिरीची माहिती कळते. कायदा हा कुठल्याही व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी नसतो. सुप्रीम कोर्टाने सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. तर मुंबई हायकोर्टानेही कंगनाविरोधातील कारवाई अप्रमाणिक आणि अशुद्ध हेतूने केल्याचा मत नोंदवत महापालिकेची कारवाई रद्द ठरवली. यासोबत संजय राऊत यांची वागणूक संसदीय सदस्याला शोभणारी नाही असं कोर्टाने झापलं'', अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली. 

शेतकऱ्यांना दिलेलं वचन मुख्यमंत्री विसरले-

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना न दिलेलं वचन मुख्यमंत्र्यांना लक्षात राहीलं, पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेलं वचन ते विसरले, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. धान उत्पादकांना बोनस दिला याबाबत सरकारचं स्वागतच आहे पण सोयाबीन आणि कापूर उत्पादकांचं काय? त्यांना मदत देण्याची मागणी यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केली.  

टॅग्स :संजय राऊतदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकारशिवसेनाभाजपा