'राज ठाकरेंचं भाषण वैचारिक पद्धतीचं होतं'; शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्यानं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 15:30 IST2022-05-23T15:16:38+5:302022-05-23T15:30:54+5:30

मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या पुण्यातील भाषणाचं शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी कौतुक केलं आहे.

Shiv Sena leader Bhaskar Jadhav has lauded MNS chief Raj Thackeray's speech in Pune. | 'राज ठाकरेंचं भाषण वैचारिक पद्धतीचं होतं'; शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्यानं केलं कौतुक

'राज ठाकरेंचं भाषण वैचारिक पद्धतीचं होतं'; शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्यानं केलं कौतुक

मुंबई/रत्नागिरी- मनसेप्रमुखराज ठाकरे यांची रविवारी पुण्यात सभा झाली. या सभेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवरही त्यांनी टीका केली. राज ठाकरेंच्या या टीकेनंतर शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं. 

शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरे यांच्या भाषणातून त्यांना आलेली निराशा दिसून आली. राज ठाकरे वैफल्यग्रस्त आहेत. त्यांनी त्यांच्या भाषणात शिवसेनेवर बोलू नये. ते काय करणार आहेत, किंवा काय करतायत, याविषयी त्यांनी बोलावं, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. 

पंतप्रधान मोदींचे कौतुक करून बृजभूषण भूमिका बदलत नाही; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंवर निशाणा

शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी देखील राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, असं म्हणत त्यांनी टीका केली होती. मात्र याचदरम्यान शिवसेनेचे रत्नागिरीमधील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतुक केले आहे.  राज ठाकरेंचे भाषण हे राजकीयदृष्या प्रगल्भतेचे आणि वैचारिक पद्धतीचे होते, असं भास्कर जाधव म्हणाले. तसेच राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे गांभीर्याने पाहावे. राज ठाकरेंच्या भाषणाची चेष्टा करु नये, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा रद्द करण्याच्या वक्तव्यावरुन भाजपाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असल्याचं दिसून येतं, असं भास्कर जाधव म्हणाले. भाजपाचं खरं रुप काय, त्यांनी काढलेली नखं राज ठाकरेंनी वेळीच ओळखली. म्हणून मी हे भाषण राजकीय प्रगल्भतेनं घेण्याची गरज आहे. गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असं म्हणतोय, असंही भास्कर जाधवांनी म्हटलं. भास्कर जाधव यांच्या या विधानाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

इतकी नौटंकी करूनही तुमचे 'आदित्यजी' तुम्हाला हात देईना; मनसेची दीपाली सय्यद यांच्यावर टीका

तेव्हा कुठे होते हे हिंदुत्ववादी?- राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले, रेल्वे भरतीच्या जागा महाराष्ट्रात, पण जाहिरात मात्र उत्तर प्रदेशातील वृत्तपत्रात होती. भरतीसाठी उत्तर प्रदेशातून मुले आली होती. त्यांना विचारण्यासाठी कार्यकर्ते गेले होते. त्यातून राडा झाला. नंतर राज्यामध्ये जिथे जागा, तेथील वृत्तपत्रात जाहिराती सुरू झाल्या. टोल आंदोलन हाती घेतले आणि ६४ ते ७० टोलनाके बंद पडले. पाकिस्तानी कलाकारांना देशातून हाकलून दिले. त्यावेळी कुठे होते हे हिंदुत्ववादी, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

भोंगा आंदोलन सुरूच- राज ठाकरे

भोंगे आंदोलनसुरू केले आणि पहिल्यांदाच असे घडले. पहाटेची अजान बंद झाली. ९४ टक्के भोंग्यांचा आवाज कमी झाला. हे आंदोलन एक दिवसाचे नाही. दोन-चार दिवसांत एक पत्र देणार, ते घराघरांत द्यावे. भोंगा प्रकरणात २८ हजार मनसे सैनिकांना नोटिसा गेल्या. भोंगा आंदोलन इथून पुढे सुरूच राहणार असल्याचे राज यांनी सांगितले.   

Web Title: Shiv Sena leader Bhaskar Jadhav has lauded MNS chief Raj Thackeray's speech in Pune.