“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 16:55 IST2025-07-12T16:51:24+5:302025-07-12T16:55:34+5:30
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: काँग्रेसला पंतप्रधान मोदी यांचीच स्वप्ने पडतात. काही झाले तरी पंतप्रधान मोदीच दिसतात. मोहन भागवत जे बोलले, त्याचा संबंध पंतप्रधान मोदींशी का जोडला जात आहे, अशी विचारणा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली.

“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: राज्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येत असून, दुसरीकडे बिहार निवडणुका आणि अन्य मुद्द्यांवरून राष्ट्रीय पातळीवरील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांनी ७५ व्या वर्षी निवृत्त होण्यावरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष भाजपावर टीका करत आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधत आहेत. एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी सांगितलेल्या एका आठवणीचा संबंध पंतप्रधान मोदी यांच्या निवृत्तीशी जोडला जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, याबाबत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी वेगळेच मत मांडले आहे.
चातुर्मास सुरू झाला असून, या निमित्ताने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती मुंबईत आहेत. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच स्वप्ने पडतात. काही झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसतात. मोहन भागवत हेही ७५ वर्षांचे होत आहेत. कदाचित मोहन भागवत स्वतः विषयीच बोलत असतील. आता त्यांनाही शांततेने जीवन जगावेसे वाटत असेल. आत्मचिंतन करावेसे वाटत असेल. मोहन भागवत बोलले, याचा संबंध पंतप्रधान मोदी यांच्याशी का जोडला जात आहे. ७५ वर्षांचा नियम भाजपाने पक्षांतर्गत बाबतीत ठरवला आहे, आता तो नियम राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोहन भागवत यांना लागू करायचा असेल. असा विचार का करत नाही. प्रत्येक गोष्टीत पंतप्रधान मोदी यांच्याशी जोडायची गरज नाही. मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव घेतले नाही, तरी तुम्ही संबंध का जोडत आहात, असा सवाल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला आहे.
जुने लोक खुर्च्या सोडतील, तेव्हाच नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल
मोहन भागवत यांचा असा विचार असू शकतो की, ७५ वर्षांचा नियम चांगला आहे. भाजपाने सुरू केला आहे. आता आपण हा नियम राष्ट्रीय स्वयंसेवक संघात लागू करावा. संघातही नवीन तरुण मंडळी येत आहेत. तरुण मंडळींनाही जबाबदाऱ्या मिळायला हव्यात. जुने लोक जेव्हा नवीन लोकांना संधी देतील, आपल्या खुर्च्या रिकाम्या करतील, तेव्हाच हे शक्य होईल. त्यामुळे मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी असा काहीतरी विचार करत असतील. पुढे जाऊन अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात. असाही कयास लावायला हवा. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्याशी याचा संबंध का जोडला जात आहे, ही बाब समजण्यापलीकडील आहे, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्यानंतर राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी दुसरे चेहरे आहेत, असे काँग्रेसकडून म्हटले जात आहे. यावर बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधी यांचा चेहरा एक पर्याय म्हणून पुढे केला जात असेल, तर यापेक्षा चुकीचे दुसरे काही असू शकत नाही. पक्ष आपल्या नेत्याला दुसऱ्या स्थानी ठेवत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या नेत्याला क्रमांक एकवर ठेवत असतो. काँग्रेस पक्षाची वैचारिक दिवाळखोरी यावरूनच दिसून येते, असा खोचक टोला शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी लगावला. ते टीव्ही९शी बोलत होते.