“RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ वाचायला हवे”; संजय राऊत पुस्तक पाठवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:06 IST2025-06-04T13:02:00+5:302025-06-04T13:06:54+5:30
Sanjay Raut News: या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच व्यक्ती कधी मला नाराज दिसत नाही, ती म्हणजे अजित पवार. ते त्यांचे स्कील आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

“RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ वाचायला हवे”; संजय राऊत पुस्तक पाठवणार
Sanjay Raut News: गेल्याच महिन्यात संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. हे पुस्तक आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पाठवणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मोहन भागवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक वाचायला हवे. त्यांच्या स्वयंसेवकांनी कष्ट करून एका उदात्त हेतूने जे सरकार सत्तेत आणले आहे, त्या लोकांनी देशाचा कसा नरक केला आहे, हे त्यांना कळायला हवे. या लोकांनी मानवी स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा कसा गळा घोटलेला आहे. हे या पुस्तकातून सरसंघचालकांना समजेल, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, दिल्लीत बैठक नव्हती. इंडिया आघाडीची जर बैठक असतील तर उद्धव ठाकरे असते, स्वतः शरद पवार असते, अखिलेश यादव असते, लालू यादव असते, ममता बॅनर्जी असत्या, सगळे प्रमुख असते. विशेष अधिवेशन संदर्भात एक ड्राफ्ट तयार करायचा होता, त्यासाठी आम्ही चार ते पाच लोक बसलो होतो. इंडिया आघाडीची बैठक राहुल गांधी बोलवतील. शरद पवार आमचे नेते आहेत. नक्की त्यांची भेट घेऊ. परंतु, शरद पवार यांनी अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाही. पत्रावर सही सुप्रिया सुळे यांची लागणार आहे. परंतु, त्या परदेशात आहेत. एवढेच तुम्ही समजून घ्या, असे संजय राऊत यांनी सांगितले.
नाशिकमधून ज्या बातम्या येत आहेत, तसे काही नाही
सुधाकर बडगुजर यांनी बोलून दाखवलेल्या नाराजीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना भेटो किंवा पंतप्रधानांना भेटोत. त्यांचे काही काम असेल. आमच्यासारखे लोक त्यांना भेटत नाहीत. कडवट शिवसैनिक अशा भेटी टाळतात. आपल्या सहकाऱ्यांमध्ये संशय निर्माण होईल, अशा भेटी टाळायच्या असतात. नाशिकमधून ज्या बातम्या येत आहेत, तसे काही नाही. एका व्यक्तीने नाराजी व्यक्त केली म्हणजे संपूर्ण शिवसेनेत फाटाफूट आहे, असे समजायचे कारण नाही. आज पक्ष अडचणीत आहेत. लाभासाठी लोक पक्ष बदलत असतात. कोणत्या महान विचारांनी कुणी पक्ष सोडला असेल, तर सांगावे. या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच व्यक्ती कधी मला नाराज दिसत नाही, ती म्हणजे अजित पवार. ते त्यांचे स्कील आहे, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.
दरम्यान, कोणी काही मौन बाळगत नाही. स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यावर त्यांचे बंधू आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली. त्यानंतर आम्ही काही भूमिका घेतली आहे. योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले.