Join us  

सांगलीत विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 3:09 PM

Sangli Lok Sabha Election : महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघावरुन तिढा वाढल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत.

Sangli Lok Sabha Election : महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघावरुन तिढा वाढल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्याविशाल पाटील यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. यामुळे आता ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या समोरील अडचणी वाढल्याचे दिसत आहे. विशाल पाटील यांनीही आज काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

'निवडणूक रोखे घोटाळ्यामध्ये भाजपचं बिंग फुटलं',उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर पलटवार

"अपक्ष उमेदवारीचा महाविकास आघाडीला फटका बसणार असं काही नाही कारण देशात हुकूमशाहीविरोधात जनमत तयार झालं आहे. ते फक्त मतदानाची वाट बघत आहेत, त्यामुळे मी आज त्यांच्यावर बोलणार नाही. जागा वाटप हे झालेलं आहे. तिनही पक्षांनी आणि महाविकास आघाडीसोबत असणाऱ्या मित्र पक्षांनी मिळून पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे. जर कुठे बंडखोरी होत असेल तर ती थांबवणे ही त्या पक्षाची जबाबदारी आहे, पण जर बंडखोरी झाली तर जनता त्यांना स्थान देईल असं मला वाटत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

"निवडणूक रोखे घोटाळ्यामध्ये भाजपचं बिंग फुटलं"

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मोदी यांनी इलेक्ट्रोरल बॉण्डबाबत भाष्य केलं."काळा पैसा तसेच अन्य स्रोतांतून आलेली बेहिशेबी रक्कम निवडणुका लढविण्यासाठी वापरली जात होती. ते रोखण्यासाठी निवडणूक रोख्यांची योजना सरकारने लागू केली होती. अर्थात ही योजना उत्तम पर्याय होता, असे आम्ही कधीही म्हटले नाही. मात्र, विरोधकांनी त्याबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरविली',असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पलटवार केला आहे.

'निवडणूक रोखे घोटाळ्यामध्ये भाजपचं बिंग फुटलं आहे. सुप्रीम कोर्टामुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे, जगातील सगळ्यात मोठा घोटाळा हा आहे. सुप्रिम कोर्टाने हे उघड केलं नसतं तर हजारो कोटी यांना कोणी दिले हे कळलं नसतं आणि चंदा दो आणि धंदा लो हे काम यापुढेही चाललं असतं, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. यामुळे आता त्यांची सत्ता येत नाही आणि हे सगळं उघड झालं. हे आधी का झालं नाही याचा विरोधी पक्षांना पश्चाताप होईल, असंही ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपाविशाल पाटीलकाँग्रेसलोकसभा निवडणूक २०२४