"आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ZP भरती करा, अन्यथा..."; रोहित पवारांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 02:52 PM2024-03-12T14:52:10+5:302024-03-12T14:53:07+5:30

राज्यातील जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरतीची जाहीरात निघून पाच वर्षे लोटली तरी विविध कारणांनी ही भरती झाली नाही.

''Recruit ZP before code of conduct goes into effect, otherwise...''; Rohit Pawar's warning to the government | "आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ZP भरती करा, अन्यथा..."; रोहित पवारांचा सरकारला इशारा

"आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ZP भरती करा, अन्यथा..."; रोहित पवारांचा सरकारला इशारा

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. गेल्या ५ दिवसांत राज्य शासनाने तब्बल ७३० शासन निर्णय घेतले आहेत. मात्र, गेल्या ५ वर्षांपासून जिल्हा परिषद भरतीचा प्रश्न न सुटल्याने तरुण पिढीने, नोकरीसाठी धावाधाव करणाऱ्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील जिल्हा परिषद भरतीला मागील पाच वर्षांपासून ग्रहण लागले आहे. ही भरती दीर्घकाळ रखडल्याने भरतीची तयारी करणारे विद्यार्थी नैराश्येत गेले आहेत. त्यावरुन, आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारला. तसेच, विद्यार्थ्यांच्यावतीने इशाराही दिला आहे. 

जिल्हा परिषद भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या अनेकांचे शासकीय भरतीसाठी लागणारे वय निघून गेल्याने त्यांचे शासकीय नोकरीचे स्वप्न भंगले आहेच, शिवाय या भरतीसाठी तयारी करण्यात वेळ आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. शासन आमची आणखी किती परीक्षा बघणार, ही भरती कधी पूर्ण करणार, असा उद्विग्न सवाल हे विद्यार्थी करत आहेत. आता, या विद्यार्थ्यांचा आवाज बनून आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 

''राज्यातील जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरतीची जाहीरात निघून पाच वर्षे लोटली तरी विविध कारणांनी ही भरती झाली नाही. आता लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याची वेळ आल्याने पुन्हा चार महिने ही भरती प्रक्रिया रखडण्याची भीती आहे. माझी शासनाला विनंती आहे की, नोकरीसाठी पाच वर्षे युवांची अग्निपरीक्षा न पाहता आचारसंहिता लागू होण्यापूर्वी येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया सुरु करा. अन्यथा लोकसभा निवडणुकीत हेच युवा तुमची अग्नीपरिक्षा घेतल्याशिवाय राहणार नाहीत.'', अशा शब्दात रोहित पवार यांनी सरकारला इशारा दिला आहे. 

परीक्षा शुल्क भरले, पण भरती रद्द

२०१९ साली जिल्हा परिषदेच्या १३ हजार ५२१ पदांची भरती जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या आशेने या भरतीसाठी अर्ज आणि शुल्क भरले. मात्र २०१९च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, कोरोनाची साथ आणि इतर विविध कारणांमुळे २०२३ पर्यंत भरती परीक्षा होऊ शकली नाही आणि पुढे ही भरतीच रद्द करण्यात आली. स्वप्न तर भंगलेच पण भरतीसाठी दिलेले शुल्कही शासनाने परत दिले नाही.

परीक्षा केव्हा?

जिल्हा परिषदेच्या १९,४६० पदांच्या भरतीत आरोग्य सेवक, आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक यांची सर्वांत जास्त पदे आहेत. ऑगस्ट २०२३ च्या जाहिरातीनंतर सर्वांत जास्त अर्ज आले. पण अद्याप या पदांसाठी परीक्षाच झालेली नाही.

उत्तीर्णांना अद्याप नियुक्ती नाही

ऑगस्ट २०२३ मध्ये ३४ जिल्हा परिषदांमध्ये ‘क’ वर्गातील १९,४६० पदे सरळ सेवेने भरती करण्याची जाहीरात निघाली. जिल्हा स्तरावर काही पदांची परीक्षा झाली. जानेवारी २०२४ मध्ये निकालही लागले, कागदपत्रांची छाननीही झाली. मात्र, अद्याप नियुक्ती दिलेली नाही.

२०१९ पासून रखडलेली भरती शासनाला घेता येत नाही. आता निवडणुकांची आचारसंहिता, त्यामुळे ही भरती आणखी रखडेल. या काळात वय निघून चालले. आमची मेहनत आणि पैसाही यामुळे वाया जात आहे. ५ उन्हाळे, ५ पावसाळे, ५ हिवाळे एका भरतीने पाहिले अजून काय शोकांतिका असेल यापेक्षा... - एक विद्यार्थी
 

Web Title: ''Recruit ZP before code of conduct goes into effect, otherwise...''; Rohit Pawar's warning to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.