भोंग्यांच्या विषयावरून राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र, दिला सक्त इशारा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 17:15 IST2022-05-10T17:13:42+5:302022-05-10T17:15:34+5:30
Raj Thackeray News: राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज एक खरमरीत पत्र पाठवले आहे. त्यामधून मनसैनिकांवर होत असलेल्या कारवाईबाबत संताप व्यक्त करतानाच आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.

भोंग्यांच्या विषयावरून राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र, दिला सक्त इशारा, म्हणाले...
मुंबई - मशिदीवरील भोंग्यांच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे कमालीचे आक्रमक झालेले आहेत. त्यात भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा वाजवून आंदोलन करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिल्यापासून हे आंदोलन मोडून काढण्यासाठी राज्य सरकारकडून सक्त कारवाई केली जात आहे. तसेच अनेक मनसैनिकांना ताब्यात घेतले जात आहे. दरम्यान, मनसैनिकांवर होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज एक खरमरीत पत्र पाठवले आहे. त्यामधून मनसैनिकांवर होत असलेल्या कारवाईबाबत संताप व्यक्त करतानाच आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणाले की, सर्व देशबांधवांना मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकार बेभान होऊन, अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यांमधील उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन करण्यापूर्वीच त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार मनसैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या. हजारोंना तडिपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडतो की, मशिदीमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकार आणि पोलिसांनी कधी राबवली आहे का? आमचे संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैदराबाद संस्थानातील रझाकार आहेत. अर्थात महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी, कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिले आहेत, हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. आता राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे तुम्हीही नाही, असा सूचक इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे.