Raj Thackeray :...अन् मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं; राज ठाकरे संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:13 IST2025-03-06T15:13:17+5:302025-03-06T15:13:36+5:30
Raj Thackeray on Bhaiyyaji Joshi Viral Video: भय्याजी जोशी यांच्या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Raj Thackeray :...अन् मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं; राज ठाकरे संतापले
Raj Thackeray ( Marathi News ) : सध्या सोशल मीडियावर आरएसएसच्या भय्याजी जोशी यांचे मराठी भाषे विषयीचे विधान चर्चेत आले आहे. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आली पाहिजे असं नाही असं वक्तव्य भय्याजी जोशी यांनी केले होते, यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी भय्याजी जोशी यांच्या विधानाचा निषेध केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करुन भय्याजी जोशी यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की,देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ?, असा सवालही केला आहे. 'भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं.... आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ?, असंही राज ठाकरे म्हणाले.
भय्याजी जोशी नेमकं काय म्हणाले होते?
घाटकोपरच्या एका कार्यक्रमात भय्याजी जोशी म्हणाले की, मुंबईची एक भाषा नाही, मुंबईत अनेक भाषा आहेत. प्रत्येक भागाची भाषा वेगवेगळी असली तरी घाटकोपर परिसरातील भाषा गुजराती आहे. मुंबईत येणाऱ्याला मराठी आलेच पाहिजे असं काही नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंची पोस्ट काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं .
देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं.... आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता... भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ?
सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत . हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ?
आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले . त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ? या असल्या काड्या घालून ( अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही ) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर ३० तारखेला गुढीपाडव्याला बोलूच !
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं !
राज ठाकरे ।