Raj Thackeray: नरेंद्र मोदी हे फकीर नाहीत, तर बेफिकीर; राज ठाकरेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 19:31 IST2019-03-09T19:31:04+5:302019-03-09T19:31:59+5:30
राज ठाकरेंनी एअर स्ट्राइकवरून केंद्र सरकारवर तोफ डागली. एअर स्ट्राइक झालं त्याबद्दल वायूदलाचे कौतुकचं आहे. सैनिकांनी आपलं काम चोखपणे पार पाडलं मात्र सरकारकडून एअरफोर्सला माहिती चूकीची दिली गेली

Raj Thackeray: नरेंद्र मोदी हे फकीर नाहीत, तर बेफिकीर; राज ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबई - पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले याचे कोणतंही दुख: न बाळगता पुढील काही दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात हसऱ्या चेहऱ्यांनी फिरत होते. कोरियामध्ये जाऊन शांततेचा पुरस्कार घेऊन आले असा घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर केला. मनसेच्या 13 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज यांनी भाषण करताना नरेंद्र मोदी यांचे फोटो दाखवले.
यावेळी राज ठाकरेंनी एअर स्ट्राइकवरून केंद्र सरकारवर तोफ डागली. एअर स्ट्राइक झालं त्याबद्दल वायूदलाचे कौतुकचं आहे. सैनिकांनी आपलं काम चोखपणे पार पाडलं मात्र सरकारकडून एअरफोर्सला माहिती चुकीची दिली गेली. 10 दहशतवादी मेले असते तरी पाकिस्तानमधून पायलय अभिनंदन वर्धमान पुन्हा परतले असते का ? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. ज्या अमित शहांनी 300 दहशतवादी मारले असा दावा केला ते एअर स्ट्राइकमध्ये को-पायलट म्हणून गेले होते असा टोला राज यांनी अमित शहांना लगावला.
त्याचसोबत निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या महिना-दीड महिन्यात पुलवामा सारखा दहशतवादी हल्ला घडवला जाऊ शकतो असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर केला.
राज यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
राफेलची कागदपत्रे चोरीला गेलीच कशी ?
भाजपवाले आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणारे कोण ?
अजित डोवाल यांच्या मुलाची कंपनी आहे, त्या कंपनीचे दोन पार्टनर आहेत त्यातील एक पाकिस्तानी
सोशल मिडीयातील भाजपकडून होणाऱ्या ट्रोलिंगला भीक घालत नाही
रोज नवीन बातम्या येत असतात, रोज काहीतरी घडावं अन् अगोदरचं मागे जावं हीच सरकारची इच्छा
गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवर मी आज बोलणार आहे कारण लोकांची स्मरणशक्ती खूप कमी असते
मला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो नंतर जाहीर करेन, आजच करेन असं नाही
लोकसभा लढवणार की नाही, याचीच चर्चा जास्त, मी पत्रकारांना गेल्या काही दिवसांत भेटलोही नाही