खासगी क्लासेसच्या नियमावलीच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 06:11 AM2019-05-27T06:11:22+5:302019-05-27T06:12:30+5:30

खासगी क्लासेससाठी जी नियमावली तयार करण्यात आली आहे, त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

Question mark on the implementation of the Private Classes Manual | खासगी क्लासेसच्या नियमावलीच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

खासगी क्लासेसच्या नियमावलीच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

Next

मुंबई : खासगी क्लासेससाठी जी नियमावली तयार करण्यात आली आहे, त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील खासगी कोचिंग क्लासेसवर कोणतेही नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे सुरतसारखी घटना टाळता यावी, यासाठी राज्य शासनाकडून क्लासेससाठी नियमावली आणणार का आणि आणल्यास तिची अंमलबजावणी करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे खासगी क्लासेसच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थिती आणि सामना या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
खासगी क्लासेससाठी नियमावली तयार करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार समिती स्थापन करण्यात आली. समितीने सादर केलेल्या नियमावलीच्या मसुद्यावर चर्चा झाली. त्यानंतर पुन्हा नव्याने शिफारशी मांडल्यात आल्या. त्यात सर्व हरकती व सूचनांचा स्वीकार करून आदर्श नियमावली समितीने राज्य शासनाकडे सादर केली. त्यानंतर त्या नियमावलीवर अद्यापर्यंत काहीच हालचाली राज्य शासनाकडून झालेल्या नाहीत. एका क्लासमध्ये किती संख्या निश्चित असावी, क्लासेस कोणत्या परिसरात घ्यावेत, अशी कोणतीही नियमावली लागू नसल्याने विद्यार्थी असुरक्षित आहेत. याचा सरकारने आता गांभीर्याने विचार करावा, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
>विद्यार्थ्यांना आपत्कालीन प्रशिक्षण आवश्यक
सुरत येथी कोचिंग क्लास दुर्घटनेनंतर क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोचिंग क्लासेसमधील सुविधांवर सरकारचा अंकुश आवश्यक आहेच, मात्र सोबतच शाळेतूनही शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आपत्कालीन प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. इमारत कोसळणे, आग, भूकंपासारख्या नैसर्गिक तसेच अन्य प्रकारच्या आपत्तीच्या वेळेस नेमके काय करायचे याचे कोणतेही व्यवस्थापन शाळांमध्ये किंवा क्लासेसमध्ये नसते. कित्येकदा शाळेत साधी अग्निशमन यंत्रणाही नसते. इतकेच काय तर शाळेचे जिने, वर्गाबाहेरील मोकळी जागा इतकी अरुंद असते की मुलांची चेंगराचेंगरी होऊ शकते. पण, या साध्या बाबींचाही विचार केला जात नाही, त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे गिरविणे गरजेची बाब बनली असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.


आपत्कालीन परिस्थितीचा सामना कसा करायचा याची कल्पना नसल्याने
सुरतमधील घटनेत विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. शाळांमध्ये पिटी विषयाचा तास असतो, मात्र त्याचा वापर इतर विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी केला जातो. याऐवजी आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळायची याचे शिक्षण त्या दरम्यान विद्यार्थ्यांना दिले तर त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होऊन अशा घटना टळू शकतील, असे मत कर्णावत क्लासेसचे शिक्षक सचिन कर्णावत यांनी व्यक्त केले.
>सुरक्षेसाठी खासगी क्लासेसचे पाऊल
खासगी कोचिंग क्लासेसवर यानिमित्ताने मोठी टीका होत असताना क्लासेसमधील सुरक्षेसाठी खासगी कोचिंग क्लासेसच्या वतीने पाऊल उचलण्यात आले आहे. १ जून रोजी रवींद्र नाट्यमंदिर येथे होणाऱ्या क्लासेसच्या परिषदेत आपत्कालीन परिस्थिती आणि सामना या विषयावर ही माहिती दिली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र कोचिंग क्लास ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कर्नावत यांनी दिली. या परिषदेला १००० कोचिंग क्लास ओनर्स उपस्थित राहणार आहेत. यासाठी नितीन नाईक हे वक्ते असणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
>समितीने सुचविलेले नियम
क्लासेससाठी योग्य पार्किंगची व्यवस्था हवी
इमारतीचे फायर आॅडिट बंधनकारक
एका वेळी विद्यार्थी संख्या ८० एवढीच अनिवार्य
हॉल हवेशीर असावा, तसेच बाहेर पडण्यासाठी पुरेशा व्यवस्था हवी
अग्निशमन प्रतिबंधक उपाय आवश्यक

Web Title: Question mark on the implementation of the Private Classes Manual

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.