कृत्रिम फुलांवर बंदी का घातली जात नाही? जयंत पाटील यांच्या मागणीवर CM फडणवीसांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:23 IST2026-02-27T16:23:56+5:302026-02-27T16:23:56+5:30
कृत्रिम फुलांवर बंदी असल्याचे अधिक स्पष्ट करण्यासाठी शासनाने स्वतंत्र जीआर काढणार

कृत्रिम फुलांवर बंदी का घातली जात नाही? जयंत पाटील यांच्या मागणीवर CM फडणवीसांचे आश्वासन
Jayant Patil: राज्यभर नैसर्गिक फुलांचे भाव घसरल्याने फुल उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या परिस्थितीमागे कृत्रिम फुलांचा वाढता वापर हे प्रमुख कारण आहे. याच संदर्भात पावसाळी अधिवेशनात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मंत्री महोदयांनी कृत्रिम फुलांवर बंदी असल्याचे सांगितले मात्र त्या बंदीची प्रभावी अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून केला.
फुल उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर ग्रीन हाऊस उभारून नैसर्गिक फुलांची लागवड करतात. त्यासाठी मोठी गुंतवणूक लागते. मात्र बाजारपेठेत कृत्रिम फुलांचा वाढता वापर झाल्याने त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळत नाही. त्यांना प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. यापुढे शंभर टक्के कृत्रिम फुलांची विक्री थांबवण्यासाठी ठोस उपायोजना करण्याची गरजेचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
नुकतेच दादर फुल मार्केट येथील फुल विक्रेत्यांना महानगरपालिकेने हटवले. या निषेधार्थ मुंबईतील फुल विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. प्रशासनाने या सर्व घडामोडींकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देत फुल विक्री सुरळीत सुरू करण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत असे त्यांनी सुचित केले.
कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी आहेच, त्याचबरोबर दादर फुल मार्केट व्यवस्थित सुरू राहिल यासाठी महापालिकेला आदेश दिले जातील.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 27, 2026
(विधानसभा, मुंबई | दि. 27 फेब्रुवारी 2026)#Maharashtra#Mumbai#MahaBudget2026pic.twitter.com/u0mOsBzkCl
बायोडिग्रेडेबल नसलेल्या कृत्रिम फुलांवर बंदी असल्याचे अधिक स्पष्ट करण्यासाठी शासनाने स्वतंत्र जीआर काढणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना उत्तर देताना सांगितले. तसेच अशा कृत्रिम फुलांचा वापर करणारे डेकोरेटर्स आणि संबंधित आस्थापने यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची तरतूद करण्यात येईल. फुल मार्केट पूर्ववत सुरू करण्याबाबत महानगरपालिकेला तातडीने आदेश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.