Join us  

Maharashtra Election 2019 : सत्ता असो वा नसो; आमची बांधिलकी जनतेशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 6:37 AM

आदित्य ठाकरे : लोकांसाठी आक्रमक भूमिका घेणारच

- गौरीशंकर घाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सत्ता आणि मंत्रिपदांपेक्षा आमची बांधिलकी जनतेच्या प्रश्नांशी आहे. त्यामुळे आरेचा मुद्दा असो अथवा पीक विम्याचा, शिवसेना कायमच लोकांच्या प्रश्नांवर आक्रमक राहिली. सत्ता असो वा नसो पुढील काळातसुद्धा हीच भूमिका कायम असेल, अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

मातोश्री निवासस्थानी निवडक पत्रकारांशी संवाद साधताना, आदित्य ठाकरे यांनी आरे येथील मेट्रो कारशेड, नाइट लाइफ, वरळीतील निवडणूक आणि शिवसेना-भाजप संबंधांसह विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. आरेबाबतची शिवसेनेची भूमिका कायम आहे. महापालिका, विधानसभा, लोकसभा आणि कॅबिनेटमध्येसुद्धा विरोधच केला. न्यायालयाच्या निकालानंतर प्रशासनाने रातोरात आरेमधील झाडे कापली, परंतु शिवसेनेने हा विषय सोडलेला नाही. या निवडणुकांनंतर शिवसेनेचे आकडे निश्चित वाढलेले असतील, तेव्हा आम्ही आमचा मुद्दा लावून धरू. झाडे कापलेली असली, तरी तिथे त्यांचे पुनर्रोपण करता येईल. हा शिवसेना विरुद्ध भाजप असा मुद्दा नाही तर पर्यावरणाचा प्रश्न आहे. या सर्व प्रकरणांत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची भूमिकाच हटवादी राहिली आहे. एमएमआरसीएलचे काही अधिकारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच दिशाभूल करत असल्याची शंका आदित्य यांनी या वेळी व्यक्त केली.

नाइट लाइफचा मुद्दा लावून धरणार असल्याचे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले की, या निर्णयामुळे मुंबईतील रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. पोलिसांवर ताण येणार असल्याचा दावा काही लोकांकडून केला जातो. प्रत्यक्षात पोलिसांवरचा ताण कमी होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच सांगितले आहे, असेही आदित्य म्हणाले.

टॅग्स :आदित्य ठाकरेवरळीआदित्य ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019