Join us  

पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरेंची मूकसंमती, लपवाछपवीचं काम; भाजपचा थेट आरोप

By मोरेश्वर येरम | Published: February 23, 2021 3:40 PM

Pooja Chavan Case: पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरुन आता थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप.

Pooja Chavan Case: पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी चर्चेत असलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (sanjay rathod) अखेर आज १५ दिवसांनंतर सर्वांसमोर आले. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पण भाजपकडून संजय राठोड यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. संजय राठोड यांच्या आजच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न विचारले आहेत. (Pooja Chavan Case BJP MLA Ashish Shelar criticises CM Uddhav Thackeray)

"पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी इतके दिवस नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज अचानक प्रकट झाले. राज्याच्या एका मंत्र्यावर गंभीर आरोप आहेत. त्यासंबंधीचे अनेक पुरावे देखील समोर आले आहेत. तरीसुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीच बोलत नाहीत. याचा अर्थ पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राठोड यांना मूकसंमती आहे हे दिसून येतं", असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

नेमकं कोणत्या आरोपाखाली चौकशी सुरूय ते सांगावंसंजय राठोड यांनी आज माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याला या प्रकरणात गोवलं जात असून मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी लावली आहे. त्यामुळे चौकशी पूर्णहोण्याआधीच बदनामी करणं थांबवावं, असं आवाहन संजय राठोड यांनी केलं. त्यावर बोलताना आशिष शेलार यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाची नेमकी कोणत्या आरोपाखाली चौकशी सुरू आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावं, अशी मागणी केली आहे. 

अदृश्य मंत्री दृश्य झाले, आता अदृश्य स्वरुपातील कारवाई दृश्य केव्हा होणार?"एका गंभीर प्रकरणातील आरोप असणारे अदृश्य मंत्री आज पंधरा दिवसांनंतर दृश्य झाले. त्यामुळे आतापर्यंत अदृश्य स्वरुपात असलेली कारवाई केव्हा  दृश्य होणार? आता अदृश्य कारभार, केव्हा दृश्य होणार?", अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली. 

मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर दडलंय काय?"पूजा चव्हाण प्रकरणात आतापर्यंत सरकार आपलं बळ वापरुन सारंकाही दडपण्याचा प्रयत्न करत आहे. आज मंत्री संजय राठोड सर्वांसमोर आलेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेश असतानाही सर्व सूचना धुडकावून समर्थकांची गर्दी केली. परवानगी नसतानाही असा सार्वजनिक कार्यक्रम होतोच कसा? असं शक्ती प्रदर्शन करुन पोलिसांवर दबाव आणण्याचा काम मंत्री करत आहेत. एवढी गर्दी जमली त्याची गुप्तवार्ता विभागाला माहिती होती की नाही? हे सांगावं. टोपीखाली दडलंय काय? असं म्हटलं जातं. पण याची सूत्र मंत्रालयातून चालवली जात आहे. त्यामुळे टोपीखाली नव्हे, तर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील केबिनमध्ये दडलंय काय?", असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :पूजा चव्हाणसंजय राठोडउद्धव ठाकरेआशीष शेलारशिवसेना