Join us  

संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलीसांनी गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करावा - मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 7:18 PM

दहशतवाद तसेच नक्षलवादाशी लढा देण्यासाठी महाराष्ट्र पोलीसांनी आणखी कठोर तयारी करण्याची सूचना केली.

ठळक मुद्देपोलीस मुख्यालयात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक गुन्हे आढावा परिषद झाली. त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. पोलीसांच्या शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी वसतिगृहे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येतील. विभागाला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मुंबई - पोलीसांनी गुन्ह्यांची उकल करण्यासह संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या मानसिकतेचा तसेच त्याच्या तंत्रांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी सोमवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिला. पोलीस मुख्यालयात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक गुन्हे आढावा परिषद झाली. त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. दहशतवाद तसेच नक्षलवादाशी लढा देण्यासाठी महाराष्ट्र पोलीसांनी आणखी कठोर तयारी करण्याची सूचना केली.

महाराष्ट्र सुरक्षित ठेवणारे शूरवीर असा पोलीस दलाबद्दल गौरवोल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, गुन्ह्यांच्या स्वरुपात आणि गुन्हेगारांमध्ये खूप बदल झाला आहे. पोलीस दलामध्ये ज्याप्रमाणे उच्चशिक्षित, तंत्रशिक्षित येत आहेत. त्याचप्रमाणे गुन्हेगार, नक्षलवादीदेखील सुशिक्षत असल्याचे दिसून येते. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या तंत्राचा, मानसिकतेचा अभ्यास करुन तपास पद्धतीत वारंवार सुधारणा करत राहिले पाहिजे. सिंगापूरसारख्या देशात प्रत्येक नागरिकाला पोलीस प्रशिक्षण बंधनकारक आहे. तर दुसरीकडे दहशतवादी कारवायांसाठी६-७ वर्षाच्या मुलांना प्रशिक्षित केले जाते. हे देखील समोर आले आहे. त्यामुळे अशा आव्हानांचा आपल्याला सामना करायचा असेल तर यासंबंधीचे शिक्षण शालेय पातळीपासूनच द्यावे लागेल. पोलीसांनी नि:स्वार्थी, नि:स्पृहपणे काम करुन त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वसामान्यांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. राज्य पोलीस दलाला आवश्यक सायबर लॅब, फॉरेन्सिक लॅब, आधुनिक तपास सामग्री दिली जाईल; पोलीसांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावले जातील. विभागाला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.पोलीस गृहप्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत : अजित पवारपोलिसांतील माणसाच्या मागे राज्य शासन खंबीरपणे उभे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पोलीसांसाठी मूलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे लक्ष देण्यात येईल. पोलीस गृहप्रकल्पांसाठी राज्यशासन आवश्यक ती तरतूद करेल. मात्र, केंद्र शासनाकडूनही अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जावा. पोलीसांच्या गृहप्रकल्पांची कामे दजेर्दार व्हावीत. ती वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. पोलीसांच्या शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी वसतिगृहे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येतील. पोलीसांच्या शारिरीक तंदुरुस्तीसाठी योजना राबविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.ड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा : गृहमंत्रीगृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, जगभरात ड्रोन हल्याच्या घटना घडत असल्याचे दिसून येते. हे एक नवीन आव्हान समोर आहे. याचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करुन कार्यान्वित करण्याची गरज आहे. पोलीस खात्यामध्ये ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ वापर कसा करता येईल याचाही विचार व्हावा. नवी मुंबई मध्ये महापे येथे ह्यमहाराष्ट्र सायबरह्णच्या मुख्यालयाच्या कामाला गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. नक्षलवादाचा सामना करण्यासाठी छत्तीसगड, तेलंगणासोबत समन्वयाने काम व्हावे. मानवी तस्करीच्या घटनांमध्ये संवेदनशीलपणे काम करुन अशा घटनांना आळा घालावा. अवैध सावकारीविरोधातही कठोर कारवाई करण्यात यावी.

यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री ग्रामीण शंभूराज देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केले. कायदा व सुव्यस्थेबाबत विविध विभागांच्या प्रमुखांनी सविस्तर सादरीकरण केले. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांच्यासह मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे, पोलीस गृहनिर्माण व पोलीस कल्याण आदींचे महासंचालक बिपीन बिहारी,मुख्यालयातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, राज्यातील शहरांचे पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

टॅग्स :उद्धव ठाकरेमुख्यमंत्रीपोलिससंजय बर्वेअजित पवार