Join us  

वेळ आल्यावर 'तो' तपशील मांडू, प्रकाश आंबेडकरांबद्दल पाटील स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 7:31 PM

आजकाल त्यांची एवढी वक्तव्य येत आहेत की, त्यांना नेमकं काय म्हणायचंय हे आम्हाला कळायला मार्ग नाही. ते सध्या शिवसेनेचे नवे मित्र होऊ पाहत आहेत.

मुंबई - वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाआघाडीत करायचा की नाही, याबाबत अद्याप प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अथवा काँग्रेसची चर्चा झालेली नाही. शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. तर, शिवसेननेच्या उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युती झाली आहे. त्यामुळे, आता वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार का, महाविकास आघाडीत त्यांना स्थान मिळणार यासंदर्भात चर्चा आणि तर्क वितर्क सुरू आहेत. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. तसेच, वेळ आल्यावर गत लोकसभा निवडणुकांचा तपशीलही मांडू, असेही पाटील यांनी म्हटले.  

भविष्यात उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना घेण्याबाबत चर्चा करतील आणि त्यानंतरच पुढील दिशा आणि भूमिका ठरेल, असे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यानंतर, आता वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या विधानासंदर्भात जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, आंबेडकर यांनी नेमकं आमच्या पक्षाबद्दल आणि मविआबद्दल काय म्हटलंय, याची पूर्ण माहिती नाही. मी लवकरच त्यांनी केलेल्या वक्तव्याची माहिती घेईन आणि उत्तर देईल, असे पाटील यांनी म्हटले.  

तसेच, आजकाल त्यांची एवढी वक्तव्य येत आहेत की, त्यांना नेमकं काय म्हणायचंय हे आम्हाला कळायला मार्ग नाही. ते सध्या शिवसेनेचे नवे मित्र होऊ पाहत आहेत. त्यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडेल असं मला सध्यातरी काही म्हणायचं नाही. अन्यथा लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात आमच्यात काय चर्चा झाली होती, याचा बराचसा तपशील माझ्याकडे आहे. तो वेळ आल्यावर मांडू, असे म्हणत जयंत पाटील यांनी आंबेडकरांसोबतच्या आघाडीवर बोलणे सध्यातरी टाळल्याचे दिसून येते. 

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसप्रकाश आंबेडकरशिवसेनाउद्धव ठाकरे