'या' मुद्द्यावरुन विरोधक पकडणार सरकारला कोंडीत; अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 14:29 IST2020-02-23T14:27:03+5:302020-02-23T14:29:42+5:30
Devendra Fadnavis: कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू, कर्जमाफी नाही आणि मुक्तीही नाही

'या' मुद्द्यावरुन विरोधक पकडणार सरकारला कोंडीत; अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार?
मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. सरकारची दिशा ठरत नाही, आणि सूरही गवसत नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही. ज्या आमच्या कर्जमाफीला नावे ठेवली, तीच पद्धत यांनी आत्मसात केली. शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. केवळ पीककर्ज यांनी समाविष्ट केले. त्यामुळे शेडनेट, पशुपालन असे सर्व प्रकारचे कर्ज या नव्या कर्जमाफीत समाविष्ट नाही, जे आमच्या काळात समाविष्ट होते असं त्यांनी सांगितले.
कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू, कर्जमाफी नाही आणि मुक्तीही नाही, जाहीर नाम्यातील एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, आतापर्यंत नव्या सरकारला सूर गवसलेला नाही. आतापर्यंतचं हे सर्वात गोंधळलेलं सरकार आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका करत येणाऱ्या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी विषयावरुन राज्य सरकारला कोडींत पकडण्याची तयारी केल्याचं दिसून आलं आहे.
Interaction with media as the Budget Session of Maharashtra Legislature begins tomorrow #BudgetSessionhttps://t.co/zcOkGrp2EU
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 23, 2020
त्याचसोबत राज्य सरकारकडून मागील काळातील निर्णय रद्द केले जात आहे त्यावरुनही विरोधी पक्षाने टीका केली. सर्व चांगल्या कामांना स्थगिती देण्याचा प्रकार वाढला आहे. जलयुक्त शिवार सरकार बंद जरूर करेल, पण जनता ती बंद होऊ देणार नाही. जलयुक्त शिवार असो की वृक्षारोपण आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही. जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप विरोधकांनी केला.
तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय उत्तम काम केले, मी त्यांचे अभिनंदन करतो, 1999 पासून ते 2019 पर्यंतच्या आर्थिक स्थितीवर सर्व निकष दाखवीत श्वेतपत्रिका नक्की काढली पाहिजे. त्यामुळे खरे चित्र जनतेपुढे येईल असं आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिलं आहे. दरम्यान, महिला अत्याचार तर पराकोटीला गेला आहे. पोलीस दलाचे खच्चीकरण केल्यामुळे त्यांचे मनोबल घटले आहे आणि त्यामुळे गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याविरोधात आम्ही आवाज उठवू असंही विरोधी पक्षाने सांगितले आहे.