Maharashtra Political Crisis: “नातवाबरोबर वेळ घालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे ४ तास, पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही”
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 14:29 IST2022-07-19T14:28:50+5:302022-07-19T14:29:36+5:30
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.

Maharashtra Political Crisis: “नातवाबरोबर वेळ घालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे ४ तास, पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही”
मुंबई: एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यकारभार सुरू केला असताना, दुसरीकडे शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष अधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे. तसेच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकास आघाडीतील नेते शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. नातवाबरोबर वेळ घालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे ४ तास, पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही, अशी बोचरी टीका नाथाभाऊंनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
राज्यात पूरस्थिती असतानाही नुकसान भरपाईचा कोणताही निर्णय झाला नाही. पालकमंत्री नसल्याने लोकांचे अश्रू पुसायला कोणी नाही. मुख्यमंत्री नातवाला भेटायला चार तास घालवतात, पण पूरग्रस्त भागात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही. राज्य सरकारची आता आयसीयू पेशंटसारखी परिस्थिती झाली आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोघांच्या नेतृत्वाखाली सरकार चालू आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.
मध्य प्रदेश अपघाताची चौकशी झाली पाहिजे
मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एकनाथ खडसे यांनीही या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. सदर घटना अतिशय दुर्देवी आहे. सदर अपघाताबाबत अधिकाऱ्यांशी बोललो, त्याबाबत माहिती घेतली. या घटनेची चौकशी झाली पाहिजे, माझी सरकारला ही विनंती आहे, अशी मागणी करत, मध्य प्रदेशसारखे अपघात टाळण्यासाठी उपाय योजना काढायला हव्या, असा सल्लाही एकनाथ खडसे यांनी दिला आहे.
दरम्यान, आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, शिवसेनेत झालेल्या बंडानंतर अनेक शिवसैनिकांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची घोषणा केली होती. तर काहींनी आपली निष्ठा दाखवण्यासाठी चक्क बाँडवर शपथपत्र करून दिली होती. मात्र, औरंगाबाद येथील काही पदाधिकाऱ्यांनी शपथपत्र लिहून देऊनही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत, शिंदे गटाची वाट धरली आहे.