लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वाढलेले तापमान, पर्यायाने वाढलेले बाष्पीभवन यामुळे मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतीलपाणीसाठा कमी झाला असून, तो आता १२ टक्क्यांवर आला आहे. मात्र, पाणीसाठ्यात घट होत असली तरी महापालिकेने मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याची हमी दिली आहे. मुंबईला ३१ जुलैपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशा रीतीने पालिकेकडून नियोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अवकाळीच्या पावसानंतरही मुंबईकरांवर उन्हाच्या झळांचा मारा आणखी जाणवत आहे. त्याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावरही होत असून, काही आठवड्यांपूर्वी पालिका मुख्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला गेला. त्यात पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा कुठलाही मानस नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे मुंबईकरांना यंदा पाणी कपातीपासून दिलासा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जूनचा पहिला आठवडा कोरडा!
यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधीच दाखल झाला आहे. मात्र, पुढचे काही दिवस पावसाने दडी मारली असून, जूनचा पहिला आठवडा कोरडा जाण्याची शक्यता आहे. पुढच्या काळात मुंबईत पावसाने वेळेवर हजेरी लावल्यास पाणी कपातीची भीती अजिबात राहणार नाही, असेही पालिकेतील सूत्रांनी सांगितले.
धरणातील पाणीसाठ्याची सद्य:स्थिती
जलाशय क्षमता उपलब्ध साठा टक्क्यांमध्ये
- अप्पर वैतरणा २२७०४७ १४४६० ६.३७
- मोडक सागर १२८९२५ ४०२०५ ३१.१८
- तानसा १४५०८० १७८७५ १२.३२
- मध्य वैतरणा १९३५३० २७१४१ १४.०२
- भातसा ७१७०३७ ७५३९७ १०.५२
- विहार २७६९८ ८९१८ ३१.२०
- तुळशी ८०४६ २५१० १२.८९