मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 19:27 IST2025-06-28T19:24:55+5:302025-06-28T19:27:21+5:30
मुंबईच्या गर्दीतून,पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून प्रवास करून अगदी वेळेवर गरम डबा पोहोचवणारे आपले सगळ्यांचे लाडके मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार आहेत.

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
मुंबईच्या गर्दीतून,पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून प्रवास करून अगदी वेळेवर गरम डबा पोहोचवणारे आपले सगळ्यांचे लाडके मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार आहेत. त्यांच्या कामाची अचूकता जगभरात प्रसिद्ध आहे. पण एक दिवस असा असतो, जेव्हा हे डबेवाले कामापेक्षा आपल्या श्रद्धेला महत्त्व देतात. येत्या सोमवारी, ७ जुलै २०२५ रोजी हेच डबेवाले आपली डबे पोहोचवण्याची सेवा एक दिवसासाठी बंद ठेवणार आहेत. आषाढी एकादशीच्या वारीला जायचं असल्याने, मुंबईचे डबेवायले एक दिवसाची सुट्टी घेणार आहेत.
'मुंबई डबेवाला' असोसिएशनने खास याबाबतची घोषणा केली आहे. त्यांचे अनेक सदस्य पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्यासाठी जातात, त्यामुळे या दिवशी डबेवाटप बंद राहील, असं त्यांनी आपल्या ग्राहकांना कळवलं आहे.
वारी म्हणजे डबेवाल्यांसाठी नुसती यात्रा नाही...
आषाढी एकादशीला हजारो वारकरी, म्हणजे विठ्ठलाचे भक्त, दिवसेंदिवस पायी चालत, असीम श्रद्धेने पंढरपूरकडे जातात. हा प्रवास आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संपतो. तिथे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांसारख्या महान संतांचा जयजयकार होतो.
डबेवाल्यांसाठी ही वारी केवळ धार्मिक विधी नाही, तर तो त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने 'मिड डे'शी बोलताना सांगितलं, "वारी म्हणजे आम्ही कोण आहोत, याचा एक भाग आहे. यामुळे आम्हाला आमची मूल्यं, आमचा समृद्ध वारसा आणि आपलेपणाची भावना पुन्हा एकदा अनुभवता येते. म्हणूनच, दरवर्षी आमच्यापैकी बरेच जण पंढरपूरला पायी जातात. आणि यासाठीच, ७ जुलै रोजी आम्ही आमची डबे सेवा बंद ठेवून या पवित्र यात्रेत सामील होणार आहोत."
मुंबईकरांनो, ७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा!
डबेवाल्यांची ही सेवा दररोज मुंबईतील हजारो ऑफिस कर्मचाऱ्यांपर्यंत घरचं ताजं जेवण पोहोचवते. पण वर्षातून एकदा, त्यांची ही धार्मिक निष्ठा त्यांना पंढरपूरला घेऊन जाते. त्यांची ही सुट्टी एक दिवसाचीच असून, पुढील दिवसापासून, म्हणजे ८ जुलै २०२५ पासून, डबेवाल्यांची सेवा नेहमीप्रमाणे सुरू होईल. त्यामुळे, मुंबईतील सर्व ऑफिसवाल्यांना ७ जुलै रोजी दुपारच्या जेवणाची पर्यायी व्यवस्था स्वतःच करावी लागेल.