मुंबईकरांनो, धुळवडीला पाणी वापरा जपून!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:26 IST2025-03-13T12:26:01+5:302025-03-13T12:26:09+5:30
बाष्पीभवनामुळे १५ दिवसांत ८ टक्क्यांनी साठा घटला

मुंबईकरांनो, धुळवडीला पाणी वापरा जपून!
मुंबई : मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील एकूण पाणीसाठा गेल्या १५ दिवसांत आठ टक्क्यांनी घटून ४३ टक्क्यांवर आला आहे. वाढत्या तापमानामुळे धरणांतील बाष्पीभवन वाढल्याने पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता होळी-धुळवडीपासूनच पाणी जपून वापरावे लागणार आहे. दुसरीकडे पालिका पाणी कपातीचा निर्णय घेणार का, याकडेही मुंबईकरांचे लक्ष आहे.
धरण क्षेत्रांत यंदा चांगला पाऊस झाला होता. ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी ही धरणे १०० टक्के भरली होती. या धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर इतकी आहे. त्या तुलनेत सध्या सात धरणांत सात लाख ३९ हजार ८३० दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.
जुलैपर्यंत पुरवून वापरावे लागणार पाणी
सध्या हा पाणीसाठा पुरेसा असला तरी मुंबईत अनेक ठिकाणी आतापासूनच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणीटंचाई भेडसावत आहे.
मुंबईत जूनमध्ये पावसाला सुरुवात होत असली तरी प्रत्यक्षात धरण क्षेत्रात जुलैत मोठा पाऊस पडतो. पाण्याची मागणी उन्हाळ्यात वाढते, त्यामुळे हा पाणीसाठा जुलैपर्यंत पुरवून वापरावा लागणार आहे.
धूलिवंदनच्या दिवशी शक्यतो पाण्याचा वापर टाळावा. कोरड्या रंगांवर भर द्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.