Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागांत उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 17:35 IST2026-03-09T17:33:26+5:302026-03-09T17:35:11+5:30
Mumbai Water Supply News: मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव पश्चिम आणि पूर्व भागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागांत उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव पश्चिम आणि पूर्व भागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १० मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून ते ११ मार्च रोजी सकाळी १० वाजेपर्यंत असा एकूण २४ तास हा पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
पी-दक्षिण विभागांतर्गत येणाऱ्या वेरावली जलाशय-१ आणि २ ला जोडणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. गोरेगाव (पूर्व) येथील दिंडोशी परिसरात १८०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर वॉल्व बसवण्याचे आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल, मात्र सुरुवातीला काही वेळ पाणी गढूळ येण्याची शक्यता असल्याने पाणी उकळून किंवा गाळून प्यावे.
कोणत्या भागांत पाणीपुरवठा बंद राहणार
गोरेगाव (पूर्व): दादाभाई नगर, पांडुरंग वाडी, कामा इस्टेट, नागरी निवारा परिषद, चित्रनगरी (फिल्म सिटी) परिसर.
गोरेगाव (पश्चिम): मोतीलाल नगर १, २ आणि ३, सिद्धार्थ नगर, बांगुर नगर, शास्त्री नगर, भगतसिंग नगर आणि लिंक रोड परिसर.
नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने पालिकेने संपूर्ण मुंबईत आधीच ५ टक्के पाणी कपात लागू केली आहे. त्यातच या दुरुस्ती कामामुळे गोरेगावच्या काही भागात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल, मात्र सुरुवातीला काही वेळ पाणी गढूळ येण्याची शक्यता असल्याने पाणी उकळून किंवा गाळून प्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.