मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली असून मुंबई आणि पालघर पट्ट्यासाठी पुढील २४ तासांसाठी रेडअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा फटका वाहतुकीला बसू शकतो. त्यामुळे मुंबईकरांची वाहतूककोंडी होऊ शकते.
प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांसाठी पालघर आणि मुंबई पट्ट्यासाठी पावसाचा रेडअलर्ट आहे. या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात 3.5 ते 3.8 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. हा इशारा पुढील २४ तासांसाठी कायम असणार आहे.
या दरम्यान लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीजवळील पर्यटन व जलक्रीडा पूर्णतः थांबवण्याचाही इशारा देण्यात आला आहे,अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
मुंबईत पावसाची रिपरिपमुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. सध्यातरी मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा सुरळीत सुरू आहे. पण पावसाचा जोर वाढला तर लोकल सेवेवर परिणाम होऊ शकतो. मध्य रेल्वेवरील वाहतूक सध्या १० मिनिटं उशीराने सुरू आहे. तर पश्चिम रेल्वेवरील गाड्या वेळेत धावत आहेत. तसंच हार्बर रेल्वे देखील सुरू आहे. पण पावसाचा जोर वाढला तर चाकरमान्यांची कोंडी होऊ शकते.
अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ, वांद्रे या उपनगरात पावसाचे चांगलीच हजेरी लावल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पश्चिम द्रूतगती महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. वाकोला पुलावरील रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली असल्याने वाहतूक मंदावली आहे. या पुलावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याचं चित्र आहे.