मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला फटका बसला आहे. लोकल गाड्या 15-20 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
दरम्यान, मुंबईकरांसोबत नेत्यांनाही या पावसाचा फटका बसला आहे. भाजपा राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आज मुंबईत असून त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र. ती पावसामुळे रद्द करण्यात आली. तसेच, या पावसाच्या पाण्यातून वाट काढताना संबित पात्रा आणि महाराष्ट्रातील भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची चांगलीच तारांबळ उडाली. दादरमध्ये चक्क त्यांना हातात बूट घेऊन पायपीट करण्याची वेळ आली.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रात्रभर मुंबईत जोरदार पाऊस कोसळल्यानंतर सकाळीपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकल गाड्या 15-20 मिनिटे उशिराने धावत आहेत. रात्रभर झालेल्या पावसाने नालासोपाऱ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे विरारहून सुटणाऱ्या गाड्यांचा वेग मंदावला आहे.
याचबरोबर, सायन, माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरला पावसानं चांगलंच झोडपले आहे.