'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' ठप्प! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 20:27 IST2026-02-04T20:26:29+5:302026-02-04T20:27:51+5:30
Mumbai Pune Expressway News Latest: मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर तब्बल २४ तासांहून अधिक काळापासून झालेल्या वाहतूक कोंडी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे.

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' ठप्प! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश
Mumbai Pune Expressway Latest News: मुंबईच्या दिशेने येणारा गॅस घेऊन जाणारा मोठा टँकर आडोशी बोगद्याजवळ पलटी झाला. मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी वाजता ही घटना घडली. त्यानंतर २४ तास उलटून गेल्यानंतरही या मार्गावरील वाहतूक कोंडी फुटलेली नाही. त्यामुळे हजारो लोक मार्गावरच अन्न पाण्याविना अडकली. या प्रकाराची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
आडोशी बोगद्याजवळ सायंकाळी गॅसचा टँकर पलटी झाल्याने दुर्घटना टाळण्यासाठी महामार्ग आणि पोलीस प्रशासनाने वाहतूक थांबवली. सकाळपर्यंत वाहतूक कोंडी दूर होणे अपेक्षित होते. पण, ४ फेब्रुवारी रात्री ८ वाजेपर्यंत रस्ता मोकळा करण्यात अपयश आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे दिले आदेश
मुंबई-पुणे या प्रचंड वर्दळ असलेल्या महामार्गावरच इतकी मोठी कोंडी झाल्याने सगळ्यांचेच लक्ष त्याकडे वेधले गेले. २४ तासांनंतरही वाहतूक कोंडी कायम असून याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.
या वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेली उपस्थिती आणि भविष्यात अशी घटना घडू नये आणि घडल्यास आणखी कोणत्या प्रकारची सज्जता असावी, याबाबत चौकशी करुन शिफारशींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत.
एनडीआरएफ, एसडीआरएफची मदत
पलटी झालेल्या टँकरमध्ये गॅस भरलेला होता. पलटी झाल्यामुळे गळती सुरू झाली. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता बळावली. त्यामुळे टँकर रस्त्यातून हटवण्यासाठी वाहतूक सुरळीत करण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफचीही मदत घेण्यात आली.
दरम्यान, बुधवारी रात्रीपर्यंतही वाहतूक कोंडी कायम राहिल्याने वाहनांची रांग वाढतच गेली. मुंबईकडे येणाऱ्या लेनवर २५ ते ३० किमीपर्यंत वाहनांचा रांगा लागल्या. महामार्गावर अडकलेल्या नागरिकांसाठी पोलीस आणि प्रशासनाने दुपारनंतर अन्न आणि पाण्याचे कीट वाटप करण्यास सुरूवात केली.