मुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 06:40 IST2018-12-12T04:50:05+5:302018-12-12T06:40:41+5:30
उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा; अहमदनगरात सर्वात कमी तापमान

मुंबईत गारठा वाढला, किमान तापमान १६ अंश सेल्सियस
मुंबई : राज्यासह मुंबईचे किमान तापमान घसरत असून, मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. किमान तापमानात घट होत असल्याने, वातावरणातील गारठा चांगलाच वाढला असून, मुंबईकरांना आता उकाड्यापासून पूर्णत: दिलासा मिळाला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे होते. गेले तीन दिवस मुंबईत गारवा जणावत होता. शनिवार, रविवारी मुंबईचे किमान तापमान अनुक्रमे १८, १७ अंश होते. सोमवारी मुंबई, महाबळेश्वरचे किमान तापमान १६ अंश होते. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १६ अंश होते. बुधवारीही ते १६ अंश राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
दोन दिवस मुंबई १६ अंशांच्या आसपासच
१२ ते १५ डिसेंबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. १२ ते १३ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल, किमान तापमान अनुक्रमे ३२, १६ अंशाच्या आसपास राहील.
महाबळेश्वरमध्ये हिमकण
महाबळेश्वरात थंडीचा जोर वाढला असून, मंगळवारी पहाटे पर्यटकांना हिमकण पाहावयास मिळाले. दवबिंदू गोठल्याने वेण्णा जलाशय परिसरात हिमकणांची चादर पसरली होती. बोटीत चढ-उतारासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर, झोपड्यांच्या छतांवरदेखील हिमकणांची चादर पसरलेली पाहायला मिळाली.