समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:40 IST2025-07-29T15:38:35+5:302025-07-29T15:40:21+5:30
Manori Project: समुद्राचे पाणी गोड करण्यासाठी मुंबई महानगरपालिका वर्सोव्यात प्लांट उभारणार आहे.

समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
समुद्राचे पाणी गोड करण्यासाठी मुंबई महानगरपालिका वर्सोव्यात प्लांट उभारणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईला दररोज ४०० एमएलडी पिण्याचे पाणी मिळेल, असा दावा मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने केला आहे. या प्रकल्पासाठी खाजगी गुंतवणूक आणि तज्ज्ञांची मदत घेतली जाईल, अशी माहिती आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रातील पाणी गोड करण्यासाठी वर्सोवा हे भौगोलिकदृष्या मनोरीपेक्षा चांगले आहे. हा प्रकल्पाचा प्रारंभिक टप्पा आहे. लवकरच परिस्थिती स्पष्ट होईल. मालाडमधील मनोरी येथे समुद्राचे पाणी गोड करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढल्या जातील. परंतु, काही तांत्रिक त्रुटींमुळे गेल्या १८ महिन्यांपासून हा प्रकल्प रखडला आहे. दरम्यान, निविदा प्रक्रिया रद्द करावी लागली, ज्यामुळे हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही.
प्रकल्पावर ३ हजार ५२० कोटी खर्च करणार
मनोरी प्रकल्पातून मुंबईला दोन टप्प्यात दररोज ४०० एमएलडी पाणी मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पावर बीएमसी ३ हजार ५२० कोटी रुपये खर्च करणार आहे. समुद्राचे पाणी पियण्यायोग्य बनवण्यासाठी १ हजार ६०० कोटी रुपये खर्च केले जातील. याशिवाय, पुढील २० वर्षांसाठी त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी १९२० कोटी रुपये खर्च केले जातील. अशाप्रकारे, समुद्राचे पाणी गोड पाणी बनवण्यासाठी या प्रकल्पावर एकूण ३ हजार ५२० कोटी रुपये खर्च केले जातील.