Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 14:03 IST2025-05-15T13:58:01+5:302025-05-15T14:03:15+5:30
Deonar Dumping Ground News: मुंबईतील देवनार कचराभूमी साफ करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने २३६८ कोटींची निविदा काढली आहे. याच निविदेवरून आता मुंबईतील राजकारण तापले आहे.

Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
Dharavi Redevelopment Project Deonar Dumping Ground: धारावीतील लोकांच्या पुनर्विकासासाठी देवनार कचराभूमीची जागा दिली जाणार आहे. ती साफ केली जाणार असून, त्यासंदर्भातील निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबईतील राजकारणाचा पारा चढला आहे.भ्रष्टाचाराचे आरोप ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधकांनी केले. त्यावर आता आशिष शेलारांनी सगळा घटनाक्रम सांगत उत्तर दिले आहेत. या मुद्द्यावरून शेलारांनी थेट आदित्य ठाकरेंवरच हल्ला चढवला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुंबईतील काही जागा देण्यात आल्या आहे. यात देवनार डपिंग ग्राऊंड अर्थात देवनार कचराभूमीची जागाही दिली जाणार आहे. ती जागा साफ करण्यासाठी तब्बल २३६८ कोटींची निविदा काढण्यात आली आहे. देवनार कचराभूमिच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने आरोप केले.
आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंना घेरले
भाजपचे मंत्री आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेत ठाकरेंच्या शिवसेनेला सुनावले आहेत.
वाचा >>देवनार डम्पिंगच्या कचऱ्यासाठी २,३०० कोटी; तीन वर्षांत १८५ लाख टन कचऱ्यावर होणार प्रक्रिया
शेलार म्हणाले, "मुंबईकर हो, सावधान! देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कटकमिशनवाल्या गिधाडांच्या घिरट्या. देवनार डम्पिंग ग्राउंड साफ करण्यासाठी २,३६८ कोटींच्या खर्चाची निविदा पालिकेने काढली आणि कचऱ्यावर राजकारण करणारी काही गिधाडे, कावळे आणि बगळे लगेच आरोपांचे पंख पसरुन या देवनार क्षेपणभूमीवर घिरट्या घालू लागले आहे", अशा शब्दात आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्ला चढवला.
शेलार म्हणाले, आदित्य ठाकरे म्होरके
"हेच कावळे, गिधाडे आणि बगळे याच कचऱ्यावरचे कटकमिशन खाऊन गेल्या पंचवीस वर्षात गलेलठ्ठ झाले आहेत. युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन, आरोप करताना आज त्यांनी केलेली लूटमार सोईस्करपणे विसरत आहेत म्हणून सांगतो", असे म्हणत शेलारांनी देवनारसंदर्भात २००८ साली काढलेल्या निविदेचाही उल्लेख केला आहे.
देवनार डम्पिंग ग्राऊंड: शेलारांनी मांडले दहा मुद्दे
1) सन. २००८ साली आदित्य ठाकरे यांची मुंबई महापालिकेत सत्ता असताना देवनार डम्पिंग ग्राउंड वरील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी निविदा काढण्यात आली त्याची किंमत ४,५०० कोटी होती.
2) आतापर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते.
3) आम्ही त्यावेळी या कंत्राटाला विरोध केला होता, या कंत्राटामध्ये अनेक उणीवा आहेत हे आम्ही दाखवले होते. हा निधी वाया जाणार ही बाब आम्ही त्याचवेळी मुंबईकरांसमोर उघड केली होती.
4) पण आमच्या विरोधाला न जुमानता तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ४,५०० कोटी रुपयांची देवनार डम्पिंग ग्राउंडची निविदा मंजूर केली. कटकमिशन खाल्ले आणि पुढे काहीच झाले नाही.
5) कचऱ्याचे ढिगारे देवनारमध्ये आजही कायम आहेत, दुर्गंधीने मुंबईकरांचा श्वास कोंडला आहे. दमा, फुफ्फुसाच्या आजारांनी मुंबईकर गेली ४० वर्षे हैराण झाले आहेत.
6) देवनार डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करा अन्यथा एक वर्ष मुंबईतील नव्या बांधकामावर बंदी आणा असे सांगून न्यायालयाने झोडपून काढेपर्यंत सत्ताधारी म्हणून उबाठाने काहीच केले नाही.
7) ४,५०० कोटीचे कंत्राट दिले त्याचा हिशेब कोण देणार? आता हेच पालिका कचरा उचलण्याची निविदा काढली तरी ओरडणार...
"मुंबईकर हो समजून घ्या... ज्यांनी ज्या कामासाठी ४,५०० कोटीची निविदा दिली, मलाई खाल्ली आणि पळ काढला तेच आता २,३६८ कोटी कशाला खर्च करताय? म्हणून ओरडत आहेत. मग त्यांनी देऊ केलेले ४,५०० कोटी मोठे की, आजचे २,३६८ कोटी?", असा सवाल शेलारांनी उपस्थित केला आहे.
"ज्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार येथील जागा दिली जाणार आहे, त्यातील एक इंच ही जागा अदानीच्या नावावर होणार नाही. धारावी प्रकल्पाचा पुनर्विकास होताना मुंबई महापालिका, सरकार यांना महसूल मिळेल, अपात्र झोपडपट्टी वासीयांना ही घर मिळणार, मोकळी मैदाने, बगीचे, शाळा अशा सुविधा मुंबईकरांना मिळणार आहेत तरीसुद्धा या प्रकल्पाला आदित्य ठाकरे आणि उबाठाचा विरोध का?", असा प्रश्न शेलारांनी ठाकरेंच्या शिवसेनेला विचारला आहे.