Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 06:26 IST2025-06-15T06:25:36+5:302025-06-15T06:26:52+5:30
Mumbai Govandi Accident: गोवंडीतील संतप्त रहिवाशांचा सवाल , अवजड वाहने पुलावरून सोडण्याची मागणी

Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
मुंबई : मुंबई महापालिकेने ६०० कोटी रुपये खर्चून बांधलेला घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड पूल २०२१ मध्ये वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, या पुलावरून अवजड वाहनांना परवानगी नाही. त्यामुळे ही वाहने डम्पिंग, बैंगनवाडी आणि शिवाजीनगर सिग्नलवरून भरधाव जातात. येथे स्पीड ब्रेकरही नाही. हा परिसर सतत वर्दळीचा असल्याने येथे अपघात वाढत आहेत, अशी भीती रहिवाशांनी शनिवारच्या अपघातानंतर व्यक्त केली.
गोवंडी येथील शिवाजीनगर सिग्नलवर शनिवारी उभ्या असलेल्या एका दुचाकीला मागून भरधाव येणाऱ्या डंपरने धडक दिली. यात दुचाकीवरील चौघांचाही मृत्यू झाला. चौघांपैकी तिघे हे चौदा वर्षांखालील होते. तर दुचाकीचालक डिलिव्हरी बॉय होता. साकीनाका येथे राहणारा हा चालक गोवंडीमध्ये काही कामानिमित्त आला होता.
दरम्यान, जखमींना तातडीने घाटकोपरमधील राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे गोवंडीतील रहिवाशांनी वाहतूक पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला असून, येथील त्रुटींवर त्यांनी बोट ठेवले आहे.
स्थानिकांनी उपस्थित केलेले प्रश्न?
- २०२१ मध्ये लिंक रोड सुरू झाला. मुळात हा रस्ता अवजड वाहनांसाठी हा असेल तर तेव्हापासून त्यांना पुलाखालून का प्रवेश दिला जातो.
- डम्पिंग, बैंगनवाडी आणि शिवाजीनगर या तिन्ही सिग्नलवर स्पीड ब्रेकर का नाहीत?
- सिग्नलवर सीसीटीव्ही आहेत. मात्र, ते सुस्थितीत आहेत का?
- तिन्ही सिग्नलवर वाहतूक पोलिस का नसतात?
- अपघात झाल्यानंतर एवढा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला. मग इतरवेळी पोलिस कर्मचारी का नसतात?
शिवाजीनगर, बैंगनवाडी, डम्पिंगच्या परिसरात मोठी वर्दळ असते. त्यामुळे लिंक रोड खालून अवजड वाहनांना सोडण्याऐवजी पुलावरून वाहने सोडा. आम्ही कित्येक निवेदने दिली. मोर्चे काढले. मात्र, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. प्रशासन आणखी अपघात होण्याची वाट बघत आहे का? असा प्रश्न गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटीतील फय्याज आलम शेख यांनी उपस्थित केला.