Mumbai: मुंबईत सहा महिन्यांत कुटुंब न्यायालयांत घटस्फोटाच्या १५,५५२ प्रकरणांची नोंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:45 IST2025-06-16T16:41:54+5:302025-06-16T16:45:46+5:30

विवाहबंधने पवित्र मानली जात असली तरी धकाधकीच्या आयुष्यात विवाह टिकविणे आव्हानात्मक बाब ठरत आहे.

Mumbai: 15,552 cases filed in family courts in six months | Mumbai: मुंबईत सहा महिन्यांत कुटुंब न्यायालयांत घटस्फोटाच्या १५,५५२ प्रकरणांची नोंद!

Mumbai: मुंबईत सहा महिन्यांत कुटुंब न्यायालयांत घटस्फोटाच्या १५,५५२ प्रकरणांची नोंद!

मुंबई: विवाहबंधने पवित्र मानली जात असली तरी धकाधकीच्या आयुष्यात विवाह टिकविणे आव्हानात्मक बाब ठरत आहे. कधी कोर्टाची पायरी चढण्यास न धजावणारी लोक घटस्फोटाच्या निमित्ताने कोर्टाची पायरी चढू लागले आहेत. जानेवारीपासून जूनच्या मध्यापर्यंत राज्यातील सर्व कुटुंब न्यायालयातघटस्फोटासाठी व अन्य कारणांसाठी १५,५५२ प्रकरणे दाखल झाली आहेत. ही चिंतेची बाब असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षात मुंबईसारख्या ठिकाणीही घटस्फोटाचे प्रमाण वाढते आहे. धकाधकीचे जीवन एकमेकांना वेळ न देणे, दाम्पत्यामध्ये संवादाचा अभाव, कामाचा तणाव, व्यभिचार, घरगुती वाद अशी अनेक कारणे घटस्फोटाला कारणीभूत ठरत आहेत. कामाचे तास वाढल्याने  जोडीदाराला वेळ देण्यास मिळत नाही. घराच्या बाहेरच जास्त वेळ असल्याने तिथलीच व्यक्ती आवडली की त्याच्याबरोबर विवाहबाह्य संबंध  ठेवले जाते. आजकाल हे सर्व सामान्य मानण्यात आले आहे. 

विवाहित असलेल्या व्यक्तीशी प्रेमसंबंध ठेवू नये, असे विचार कालबाह्य मानण्यात येतात. त्यामुळेही घटस्फोटाच्या आकडेवारीत भर पडत आहे, असे ॲड. प्रकाश वाघ यांनी सांगितले. काही वर्षांपासून मुंबई कुटुंब न्यायालयात प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी न्यायाधीश कमी पडू लागले आहेत म्हणूनच काही महिन्यांपूर्वी सरकारने १७ कुटुंब न्यायालये वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसऱ्याच महिन्यात विभक्त
अलीकडे जोडीदाराचे पटत नसेल तर त्याला समजण्यात जास्त कालावधी न घालवता लग्नाच्या दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यातच घटस्फोट घेण्याची तयारी केली जाते. कारण समजावण्यात कोण वेळ घालवणार?  कामाचे ओझे इतके आहे की, साथीदाराला समजावून घेण्यासाठी वेळ नाही. त्यापेक्षा झटपट घटस्फोट घ्या आणि दुसऱ्या विवाहाला मोकळे व्हा, असाच आजकालच्या तरुणांचा समज आहे, असे ॲड. सुरेखा बेळे यांनी सांगितले.

विचित्र कारणे समोर
कोरोनानंतर घटस्फोटाची विचित्र कारणे समोर येऊ लागली. नवऱ्याला किंवा बायकोला स्वयंपाक येत नाही. कधी नवऱ्याचे अति प्रेम तर कधी जोडीदाराची कामवासना पुरवताना झालेली दमछाक...अशी कारणे घटस्फोटासाठी देण्यात येत आहेत.

कुटुंब न्यायालयातील  २०२५ मधील प्रकरणे 

महिना: दाखल- निकाली

जानेवारी: ३,१२३- ३,८४५
फेब्रुवारी: २,२५१- २,२४८
मार्च:    ३,०८९- ३,१५८
एप्रिल: ३,११५- २,४२५
मे: २,७९७    ३- १४५
जून:    १,१७७- १,०३०

गेल्या पाच वर्षातील लेखाजोखा

वर्ष:  प्रलंबित- निकाली 
२०२५: १३,७२१-    १,८३१
२०२४: १९,३९७-     ६,६५९
२०२३: ११,२६७-    २,७९७
२०२२: ७,६१४- १,८७४
२०२१    : ४,६६८- ११५२

Web Title: Mumbai: 15,552 cases filed in family courts in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.