CM Devendra Fadnavis on Mulund Accident: शनिवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील RAJV (मिलन) परिसरात सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या बांधकामादरम्यान पियर क्रमांक P196 जवळ एका अपघाताची घटना घडली. उंचावरून पॅरापेटचा एक भाग खाली पडून तो तेथून जात असलेल्या रिक्षावर आदळला. या घटनेत काहींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे. मेट्रो प्रकल्पाची टीम घटनास्थळी उपस्थित असून, मुंबई महापालिका प्रशासन, मुंबई अग्निशमन दल, मुंबई ट्रॅफिक पोलिस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या समन्वयाने मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, या घटनेच्या चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.
"मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे," अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून (CMO) देण्यात आली आहे.
आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका
आदित्य ठाकरे एक्स वरून सरकारवर टीका केली. "आज बांधकामाधीन मेट्रो ४ मार्गाचा एक मोठा तुकडा एका रिक्षा आणि एका कारवर पडला. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी एक भिंत कोसळली होती आणि तत्कालीन नव्याने उद्घाटन झालेल्या मेट्रो मार्ग ३ मध्ये पावसाचे पाणी भरले होते. सरकार या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकेल का? कदाचित नाही. कदाचित काही लाखांचा दंड दाखवेल आणि कंत्राटदाराला आणखी निविदा काढू देईल. जर तुम्ही नीट पाहिले तर, काम पूर्ण होण्यापूर्वीच खांब रंगवलेले आहेत. यासाठी राज्याला काही कोटींचा खर्च येईल आणि नंतर काम पूर्ण झाल्यावर, तेच काम पुन्हा करण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतील. आजही, बहुतेक पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये भयानक बॅरिकेडिंग आहेत ज्यामुळे वाहतूक कोंडी होते किंवा वाहने उघड्या खड्ड्यात पडतात. मेट्रो मार्गावरून पडणारे तुकडे, वाहतुकीचे असुरक्षित मार्ग, तासनतास मदतीशिवाय कार/बाईक उघड्या खड्ड्यात पडणे ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. भाजपच्या राजवटीत जीवाची काहीही किंमत नाही. लवकरच असा दिवस येईल जेव्हा इतर देश आपल्या देशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना या गोष्टींसाठी मार्गदर्शक सूचना जारी करतील," अशी जहरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.