मुंबई :मुंबई महानगरात १५ दिवस अगोदरच मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यातच अवघ्या काही तासांत म्हणजेच कमी कालावधीत २५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. एकप्रकारे ढगफुटीसदृश पाऊस झाला, त्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली, असे उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
रस्ते वाहतूक धीम्या गतीने सुरू असून, सखल भागात साचलेले पावसाचे पाणी आता उपसण्यात आले आहे. नालेस्वच्छतादेखील वेगाने सुरू आहे. दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले आहे, असेही त्यांनी सांगितले. शिंदे यांनी सोमवारी महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देत पावसाळ्यादरम्यान करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना व आपत्कालीन व्यवस्थापनाचा आढावा घेतला.
यावेळी राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आता उपनगरी रेल्वे सेवाही सुरळीत झाली आहे. मात्र, पावसामुळे लोकल सेवा खंडित झाल्यास नजीकच्या रेल्वेस्थानकापासून ‘बेस्ट’ची बस सुविधा उपलब्ध करावी. सखल भागात साचलेले पाणी उपसण्यासाठी ठेवलेले उदंचन पंप बंद पडता कामा नयेत, असे निर्देशही शिंदे यांनी दिले. सर्व सरकारी, महागनरपालिका यंत्रणा सतर्क ‘अलर्ट मोड’वर असून, सरकार आणि प्रशासन एक टीम बनून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरडप्रवण क्षेत्रात काळजी घेण्याची सूचना
यंदा पाऊस वेळेआधीच सुरू झाला असला तरी नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. रेल्वेच्या कल्व्हर्टखालील कचरा रोबोटच्या मदतीने स्वच्छ करण्यात येत आहे. सखल भागात ४२२ ठिकाणी पंप लावले असून, २ ठिकाणी साठवण टाक्या आणि १० ठिकाणी लघु उदंचन केंद्र कार्यान्वित केले आहे. दरडप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी संरक्षक जाळी बसवून येथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.