“राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 14:31 IST2025-06-03T14:29:16+5:302025-06-03T14:31:56+5:30

MNS Sandeep Deshpande News: केवळ सकारात्मक आहोत, असे बोलून काहीच उपयोग नाही, अशी टीका मनसे नेत्यांनी उद्धवसेनेवर केली आहे.

mns sandeep deshpande said as long as raj thackeray is here no one can end the thackeray brand | “राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले

“राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले

MNS Sandeep Deshpande News: मुंबईसह राज्यातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या महायुतीच्या पक्षांमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे. ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणाऱ्या नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक कार्यकर्ते यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यातच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनाही बळ मिळत आहे. यातच राज ठाकरे आहेत, तोपर्यंत ठाकरे ब्रँड कुणीही संपवू शकत नाही, असे मनसे नेत्यांनी म्हटले आहे. 

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, माझ्या माहितीप्रमाणे अद्याप कोणताही प्रस्ताव मनसेकडे आलेला नाही. जर प्रस्ताव आला, तर त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील. आम्ही सकारात्मक आहोत, हे केवळ बोलून चालणार नाही, खरेच सकारात्मक असतील, तर त्याबाबतची ठोस कृती करायला हवी. कृती कुठेही दिसत नाही. नुसती बोलाची कढी अन् बोलाचा भात असे सुरू आहे. प्रत्यक्ष कृती होताना दिसत नाही. कृती झाली तर राज ठाकरे निर्णय घेतील. ठाकरे ब्रँड संपवायचा कुणीही प्रयत्न केला, तरी जोपर्यंत राज ठाकरे आहेत, तोपर्यंत ठाकरे ब्रँड संपवू शकत नाही, असे संदीप देशपांडे यांनी नमूद केले.

मतांच्या लाचारीसाठी कुणीही स्वतःचा स्वाभिमान सोडू नये

मतांच्या लाचारीसाठी कुणीही स्वतःचा स्वाभिमान सोडू नये. मग ते प्रताप सरनाईक का असेनात, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली. तसेच पुण्यातील प्रकार अत्यंत दुर्दैवी होता. आजच्या २१ व्या शतकात लोक हुंड्यासारख्या गोष्टी करत असतील, तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. अशा प्रकारचा अन्याय कुणीही सहन करता कामा नये. त्याच्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. अशा कोणत्या आमच्या भगिनींवर अन्याय होत असेल, तर निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा. आमचा महाराष्ट्र सैनिक ताकदीने एक भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा सुरू असेल तरी ती समोर कशाला येईल? योग्य वेळी ती सांगू, असे राऊतांनी म्हटले आहे.

 

Web Title: mns sandeep deshpande said as long as raj thackeray is here no one can end the thackeray brand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.