Join us

“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:55 IST

MNS Stand On Alliance With Uddhav Thackeray Group: मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू झाले असून, नेत्यांचे मनोमिलन कधी होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

MNS Stand On Alliance With Uddhav Thackeray Group: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबतची चर्चा आता जोर धरू लागली आहे. राज्यातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते एकमेकांना भेटत आहेत. कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू झाले असून, नेत्यांचे मनोमिलन कधी होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना मनसे पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. 

पत्रकारांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीसंदर्भातील निर्णय राज ठाकरे घेत असतात. यासंदर्भात कोणतीही चर्चा पक्षांतर्गत झाली नाही. आमचे तोंड दुधाने पोळले गेले आहे. त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पितो. जोपर्यंत कोणताही ठोस प्रस्ताव राज ठाकरेंपर्यंत पोहोचत नाही, तोवर आम्ही निर्णय घेणार नाही. ज्यावेळेला येईल, त्यावेळी योग्य तो निर्णय राज ठाकरे घेतील, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले. 

तुम्ही एक पाऊल पुढे या, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील

दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे, सगळी शिवसेना म्हणत असेल की, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबर जायला हवे, तर उद्धव ठाकरेंकडून एक कॉल यावा अशी अपेक्षा आहे. कॅमेऱ्यासमोर बोलणाऱ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी बोलावे. एक पाऊल पुढे या, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील. जोपर्यंत त्यांच्याकडून काहीही ठोस येत नाही, तोवर आम्ह पुढे कसे जाणार, असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. 

आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही

२०१४ आणि २०१७ मधील घटनांचे आम्ही साक्षीदार आहोत. ज्यावेळी युती करावी अशी आमची भावना होती, तेव्हा म्हणजेच २०१४ मध्ये बाळा नांदगावकर हे राज ठाकरेंच्या आदेशाने मातोश्रीवर गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही. पण सुभाष देसाईंना ते भेटले, तेव्हा राज ठाकरेंना युती करायची आहे, असे त्यांना कळवले होते. याला म्हणतात प्रस्ताव. असा कोणताही प्रस्ताव आता आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे त्यावर राज ठाकरेंनी कसा निर्णय घ्यायचा, अशी विचारणा या मनसे नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

 

टॅग्स :मनसेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनासंदीप देशपांडेअविनाश जाधवशिवसेनाउद्धव ठाकरे