Join us

ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "दोघं भाऊ, फक्त एक फोन अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 11:23 IST

Amit Thackeray on MNS Shiv Sena Alliance: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना युतीवर भाष्य केलं आहे.

मनसेने पर्यावरण दिनानिमित्त दादर-माहिम विधानसभा मतदार संघात खिळेमुक्त वृक्ष अभियान राबवलं आहे. या अभियानात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना अमित ठाकरेंनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना युतीवरही भाष्य केलं आहे. "दोन भावांनी बोललं पाहिजे. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात" अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

"माझी भूमिका एवढीच आहे की, दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन भाऊ एकत्र येण्यात मला काही इश्यू नाही. मी २०१४, २०१७ ला बघितलंय, कोरोना काळातही पाहिलंय, कोरोनात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा राज साहेबांनी उद्धवजींना पहिला फोन केला होता. हा भीषण आजार आहे. त्यामुळे कोणतंही सरकार असो, आपण साथ दिली पाहिजे असं म्हटलं होतं. त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून युती होत नाही. त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात" असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

"झाडं लावली पाहिजेत"

"आपण झाडांमुळे जिवंत आहोत. एका माणसासाठी आपल्याला ४ झाडं पाहिजेत असा निसर्गाचा नियम आहे. पण इकडे एका झाडामागे ५ माणसं श्वास घेत आहेत. लोकांना याचं महत्व कळत नाही. आपण जेव्हा खिळा मारतो, तेव्हा झाडांनाही त्रास होतो. झाडं लावली पाहिजेत, ती वाचवली पाहिजेत, जगवली पाहिजेत" असं देखील अमित ठाकरे यांनी पर्यावरण दिनानिमित्त म्हटलं आहे. 

"महाराष्ट्र हितासाठी लढत राहू"

मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क लढवले जात असतानाच उद्धवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केलं आहे. "आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिला आहे. आमची भावना व्यक्त केली आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्यासोबत यायला तयार असेल, त्यांना आम्ही बरोबर घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. अलिकडेच आमचे नेते दीपेश म्हात्रे व मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. हे त्याचेच उदाहरण आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आमचे मन साफ आहे. जो कोणी नेता महाराष्ट्र हितासाठी आमच्याबरोबर यायला तयार असेल, जो पक्ष पुढे येत असेल, आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र येऊन लढू" असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.